राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. महाविकास आघाडी तसेच भाजपाकडून विजयी गणित जुळवण्यासाठी आमदारांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला जातोय. तसेच घोडेबाजार रोखण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी आपल्या आमदरांना मुंबईत पाचारण केलं आहे. दुसरीकडे भाजपाला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीने मदत मागावी असं आवाहन ओवौसी यांनी केल्यानंतर एमआयएमकडे मदतीसाठी कोण प्रस्ताव पाठवणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. असे असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत मोठे भाष्य केले आहे.

हेही वाचा >>> विवाहितेने चिमुरडीसह गळफास घेतला; महिलेचा मृत्यू, मुलगी बचावली

एमआयएम पक्षाची ज्यांच्यासोबत युती असेल तो पक्ष एमआयएमकडे बोलेन असे नाना पटोले म्हणाले आहेत. “ज्या पक्षांची त्यांच्यासोबत आहे, तेच लोक त्यांना निमंत्रण देतील. आमच्यासोबत समाजवादी पक्ष आहे. त्यामुळे आमच्याकडून समाजवादी पक्षाला विनंती केली जाणार आहे. एमआयएम राष्ट्रवादीकडे आहे,” असे नाना पटोले म्हणाले.

हेही वाचा >>> “या टोमणेसभेची स्क्रिप्टसुद्धा बारामतीवरून…”, मनसेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला!

तसेच प्रत्येक छोटा पक्ष आणि अपक्ष या सर्वांशी संपर्क केला जातोय. सर्वांशी संपर्क साधून त्यांना महाविकास आघाडीला मतदान करा अशी विनंती केली जाणार आहे, असेदेखील नाना पटोले यांनी सांगितले.

हेही वाचा >>> “ओबीसींचे राजकीय प्रतिनिधित्व घालवण्याचे महाविकास आघाडीचे षडयंत्र”; गोपीचंद पडळकरांचा आरोप

तसेच पुढे बोलताना शिवसेनेच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. काँग्रेसचे आमदार आज मुंबईमध्ये येत आहेत. त्यांना कुठे ठेवण्याची सोय केलेली आहे? मतदान करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण दिलं जाणार का? असा प्रश्न नाना पटोले यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना, “प्रशिक्षण देण्याची गरज नाही. फक्त मतदानाची पद्धत थोडी सांगितली जाणार आहे. शिर्डीमध्ये आमचं दोन दिवसांचं अधिवेशन झालं. त्याचा १०० दिवसांचा कार्यक्रम आम्ही तयार केला आहे. योगायोगाने परवा मतदान असल्यामुळे सर्व आमदार दोन दिवस येथेच राहणार आहेत. आम्हाला काँग्रेसच्या विचारधारेची चळवळ उभी करायची आहे, त्यावरही आम्हाला चर्चा करायची आहे. त्यामुळे आम्ही सर्व आमदारांना एकत्र राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. सध्यातरी लोहगड या माझ्या निवासस्थानावर आम्ही सर्वजण राहू, अशा पद्धतीचा आतापर्यंततरी आम्ही निर्णय घेतलेला आहे,” असे उत्तर नाना पटोले यांनी दिले.

हेही वाचा >>> सांगली : नवविवाहितेची विष प्राशन करुन आत्महत्या; दुसरीकडे प्रियकरानेही जीवन संपवले

दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीदरम्यान पाठिंब्यासाठी आमच्याकडे अद्याप महाविकास आघाडीचा प्रस्ताव आलेला नाही, अशी माहिती एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी दिली आहे. “महाविकास आघाडीतर्फे कोणीही माझ्यासोबत किंवा आमच्या आमदारासोबत संपर्क साधलेला नाही. त्यामुळे आम्ही वाट पाहू. जर महाविकास आघाडीला आमची गरज असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. गरज नसेल तर ठीक आहे आम्ही आमचा निर्णय घेऊ. आम्ही आमच्या आमदारांसोबत बोलत आहोत आणि एक किंवा दोन दिवसांत याबाबत निर्णय घेऊ,” असे असदुद्दीन ओवैसी म्हणाले आहेत.