महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क मैदानातील मनसेच्या मेळाव्यात आक्रमक हिंदूत्वाची भूमिका मांडतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर यथेच्छ टीका केली. दरम्यान, यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला. महाविकास आघाडीमधील दोन प्रमुख घटकपक्ष असणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादीवर राज ठाकरेंनी सडकून टीका केली. या भाषणानंतर राज्यामध्ये सत्ताधारी विरुद्ध विरोधक म्हणजेच भाजपा आणि मनसे असे दोन गट पडल्याचं चित्र दिसत आहे. वेगवेगळे नेते या भाषणावर व्यक्त होत असतानाच कोकणामध्ये शिवसेनेसोबत ३६ चा आकडा असणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्विटवरुन राज यांच्या भाषणावर प्रतिक्रिया दिलीय.

नक्की वाचा >> विश्लेषण : राज ठाकरेंनी पवारांवर केलेल्या टीकेनंतर चर्चेत आलेलं २१०० कोटींचं ‘कोहिनूर स्क्वेअर’ प्रकरण आहे तरी काय?

राणे यांनी तीन ट्विट केले असून त्यामधून त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधतानाच राज यांनी भाषणातून वास्तव दाखवल्याचं म्हटलंय. “गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील आघाडी सरकारचा पंचनामा केला. महाराष्ट्रातील वास्तववादी चित्र त्यांनी सांगितले, हे काही जणांना झोंबले आणि त्यांनी प्रतिक्रिया दिल्या,” असा टोला राणेंनी पहिल्या ट्विटमधून लगावला आहे.

नक्की वाचा >> “शरद पवारांना जातीयवादी म्हणणारे राज ठाकरे…”; अजित पवारांची संतप्त प्रतिक्रिया

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपाची युती फिसकटल्याच्या मुद्द्यावरुनही राणेंनी शिवसेनेनं केलेली ही गद्दारी हिंदुत्वासोबतची होती असं म्हटलंय. “ज्यांनी आयुष्यभर स्वार्थी, सोयीने सत्ता मिळवली त्यांनी राज ठाकरे यांच्या भाषणावर प्रतिक्रिया द्यावी, हे ही एक आश्चर्य आहे. २०१९ च्या निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपशी गद्दारी केली त्याहीपेक्षा मोठी गद्दारी हिंदुत्वाशी आहे,” असं राणे म्हणालेत.

नक्की वाचा >> “लाव रे तो व्हिडीओ म्हणणारे एका नोटीशीमुळे…”; पवारांवर राज यांनी केलेल्या टीकेवर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

तसेच, “पदासाठी, पैशासाठी गद्दारी करणाऱ्यांनी राज ठाकरेंना कितीही उत्तर दिले असले, तरी ‘गद्दारी ती गद्दारीच’. हे निष्ठेचे राजकारण नाही, हे पद आणि सत्तेसाठीचे राजकारण आहे,” असं म्हणत नारायण राणेंनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधलाय.

सध्या राज यांनी केलेल्या भाषणावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचं चित्र दिसत आहे. मनसेनं भाजपाच्या भूमिकेशी सहमती दर्शवणारी भूमिका मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यापासून ते उत्तर प्रदेशमधील विकासाच्या मुद्द्यापर्यंत अनेक बाबींमध्ये घेतलीय. राज यांनी केलेल्या टीकेला आतापर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलं आहे.