|| एजाज हुसेन मुजावर

सोलापूर : सोलापूरचे थोर  सुपुत्र डॉ. द्वारकानाथ शांताराम कोटणीस यांचे सोलापुरात उचित स्मारक मोठ्या अट्टहासाने, अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर उभारले खरे; परंतु हे स्मारक गेली दहा वर्षे केवळ धूळ खात पडले आहे. या स्मारकाला राष्ट्रीय दर्जा मिळणे अपेक्षित होते. परंतु केवळ प्रचंड उदासीनतेमुळे या स्मारकाला राष्ट्रीय दर्जा मिळणे तर दूरच राहिले; पण सध्या सोलापूर महापालिकेच्या ताब्यात असलेल्या या स्मारकाचे जतन होणेही दुरापास्त ठरले आहे. त्यापेक्षा हे स्मारक एखाद्या स्वयंसेवी संस्थेच्या ताब्यात दिल्यास तेथे तद्नुषंगाने वेगवेगळे उपक्रम चालविता येतील. पर्यटनासाठीही या स्मारकाला महत्त्व प्राप्त करून देणे शक्य होणार आहे.

sandeshkhali shahajahan shiekh
Sandeshkhali Case: लैंगिक अत्याचार प्रकरणातील फरार आरोपी आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्याला अटक नेमकी कशी झाली?
vladimir putin threatens nuclear war
युक्रेनमध्ये सैन्य पाठवल्यास जागतिक अण्वस्त्र संघर्षांचा पुतिन यांचा इशारा
dwarka pm modi
प्राचीन द्वारका नगरीच्या दर्शनातून पंतप्रधान मोदींचा अहिर समुदायाला संदेश
santhan rajiv gandhi case convict
राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषीचा सुटकेनंतर दोन वर्षांनी मृत्यू; आरोपी संथन कोण होता?

२०१० साली डॉ. कोटणीस जन्मशताब्दी वर्ष होते. त्यानंतर दुसऱ्या वर्षी- २०११ साली तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते भैया चौकात डॉ. कोटणीस स्मारकाचे लोकार्पण झाले होते. सुमारे एक एकर क्षेत्रात आकर्षक, सुंदर आणि नाजूक नक्षीकाम करून उभारण्यात आलेल्या या स्मारकात डॉ. कोटणीसांच्या सचित्र दर्शनासह त्यांनी हाताळलेल्या वस्तू आहेत. राज्य शासनाने दिलेल्या सुमारे पाच कोटी रुपये खर्चातून या स्मारकात डॉ. कोटणीसांचा पुतळा प्रथमदर्शनी नजरेस पडतो. डॉ. कोटणीस यांचा जन्म झालेल्या आणि बालपण गेलेल्या मूळ कोटणीस यांच्या मालकीच्या इमारतीचे रूपांतर स्मारकात झाले आहे. तेथे सुसज्ज अशा चार खोल्या आहेत. खुले थिएटरही आहे. परंतु हे सारे अक्षरश: धूळ खात पडून आहे. स्मारकाचे मुख्य प्रवेशद्वार सदैव बंदच असून तेथे कोणीही आत जाऊ शकत नाहीत. जर कोणी गेलेच तर तेथे तैनात असलेल्या सुरक्षा रक्षक किंवा अन्य कर्मचाऱ्यांना स्मारकाची माहिती देता येत नाही. माहीतगार माणूसच नसल्यामुळे या स्मारकाची माहिती विचारूनही मिळत नाही. यात सोलापूर महापालिकेची प्रचंड उदासीनता दिसून येते.

१९३८ साली दुसऱ्या महायुद्धात जपान व चीनमध्ये संघर्ष झाला. त्या वेळी जखमी चिनी सैनिकांच्या शुश्रूषेसाठी भारतीय डॉक्टरांचे पथक गेले होते. त्यात डॉ. द्वारकानाथ कोटणीस होते. तेथे सुमारे साडेचार वर्षे रात्रंदिवस जखमी सैनिकांची सेवा शुश्रूषा करताना ९ डिसेंबर १९४२ रोजी डॉ. कोटणीसांचे निधन झाले होते. चीन सरकारने तेथे शी चा च्वांग शहराजवळ डॉ. कोटणीस यांचे स्मारक उभारले आहे. त्यांच्या जन्मगावी सोलापुरातही त्यांचे स्मारक उभारण्यासाठी सर्वप्रथम दिवंगत स्वातंत्र्यसैनिक भाई छन्र्नुंसग चंदेले यांच्या पुढाकाराने प्रयत्न सुरू झाले. डॉ. कोटणीस आणि १९३० सालच्या सोलापूरच्या चळवळीत हुतात्मा झालेल्या चार थोर देशभक्तांमुळे सोलापूरचे नाव जगभरात गाजले. तेव्हा भाई छन्र्नुंसग चंदेले यांच्या पुढाकाराने प्रथम चार हुताम्यांचे स्मारक उभारले गेले. त्यानंतर डॉ. कोटणीसांचेही स्मारक त्यांच्या मूळ निवासस्थानी उभारण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. तोपर्यंत चीनमध्येही डॉ. कोटणीसांचे स्मारक उभारले गेल्याचे सोलापूरकरांना माहीत नव्हते. डॉ. कोटणीस हे विस्मृतीत गेले होते.

या पार्श्वभूमीवर भाई छन्र्नुंसग चंदेले यांच्या पुढाकारानंतर पुढे हालचाली सुरू झाल्या आणि १९८५ साली मूळ सोलापूरकर असलेले माकपचे दिवंगत पॉलिट ब्युरो सदस्य मधुकर पंधे यांच्या मदतीने तत्कालीन महापौर प्रा. पुरणचंद्र पुंजाल यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. कोटणीस स्मारक समिती गठित झाली. प्रा. फक्रुद्दीन बेन्नूर, शंकर पाटील, रवींद्र मोकाशी, ए. बी. राजमाने आदींच्या सहभागातून महापिलिकेच्या वतीने ९ डिसेंबर १९८५ रोजी डॉ. कोटणीस यांचा स्मृतिदिन सोलापुरात पहिल्यांदाच पाळण्यात आला. त्या वेळी चिनी दूतावासाचे शिष्टमंडळही आले होते. तेव्हापासून स्मारक उभारण्यासाठी २५ वर्षे सातत्याने व चिकाटीने प्रयत्न झाले. डॉ. कोटणीस यांच्या पत्नी डॉ. को चिंग लान यांच्यासह त्यांच्या भगिनी मनोरमा आणि वत्सला यांनीही या कामी वेळोवेळी लक्ष घालून प्रयत्न चालविले होते.

दरम्यान, २००२ साली तत्कालीन महापौर नलिनी चंदेले यांच्या कार्यकाळात डॉ. कोटणीस यांची समाधी तथा स्मारकस्थळ असलेल्या शी चा च्वांग शहराचे उपमहापौर सोलापुरात आले होते. त्या वेळी सोलापूर आणि शी चा च्वांग या दोन्ही शहरांमध्ये भगिनी शहर म्हणून करार झाला होता. या करारात दोन्ही शहरांमध्ये व्यापार, उद्योगांसह कला, नाट्य, संस्कृती आदी क्षेत्रांत आदानप्रदान करण्याचे ठरले होते. त्यासाठी आयात-निर्यात शुल्क माफ होणार होते. याशिवाय सोलापुरात डॉ. कोटणीस स्मारकासाठी चीन सरकारने देणगीही जाहीर केली होती. परंतु त्या दृष्टीने पुढे कोणताही पाठपुरावा न झाल्याने भगिनी शहरांचा करार कृतीत उतरला नाही. एवढेच नव्हे तर चीन सरकारने दिलेली दहा हजार डॉलरची देणगीही घेता आली नाही. केवळ प्रचंड उदासीनता हेच यामागचे एकमेव कारण होते.

तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यासमोर डॉ. कोटणीस स्मारकाचा प्रस्ताव आला असता त्यांनी मात्र या स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली. त्यानंतर पुढे काही दिवसांतच राज्य शासनाने सोलापुरात डॉ. कोटणीस यांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे म्हणून केंद्र सरकारकडे शिफारसही केली होती. तेथून पुढे चालना मिळाली आणि पाच कोटींच्या निधीतून डॉ. कोटणीस स्मारक उभारले गेले.

परंतु त्यास राष्ट्रीय दर्जा काही प्राप्त झाला नाही.

अनेक वर्षे चिकाटीने प्रयत्न करून डॉ. कोटणीस स्मारक प्रत्यक्षात साकार झाले खरे; परंतु महापालिकेच्या अकार्यक्षम, बेफिकिरीच्या कारभारामुळे हे स्मारक दुर्लक्षित आणि धूळ खात पडून आहे. तेव्हा या स्मारकाचा सांभाळ करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यायला हवा. स्थानिक नामवंत उद्योग संस्थांनीही सामाजिक उत्तर दायित्व निधीतून देखभाल व दुरुस्तीसाठी हातभार लावल्यास या स्मारकाला पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करता येऊ शकेल. इंडियन मेडिकल असोसिएशन सोलापूर शाखेनेही या स्मारकात वैद्यकीय सेवेसाठी काही उपक्रम सुरू करता येतील.

– रवींद्र मोकाशी, सदस्य,  डॉ. कोटणीस स्मारक समिती