एनसीपी या इंग्रजी शब्दांचा विस्तार ‘नॅचरल करप्ट पार्टी’ असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीवर तुळजापूर येथे हल्ला चढवला. तर लोहा येथील सभेत राहुल गांधी आणि अशोकरावांचीही त्यांनी खिल्ली उडविली.
लोहा येथील सभेत ते म्हणाले, मी काही पंतप्रधानांच्या घरात जन्मलो नाही किंवा मुख्यमंत्र्यांचाही मुलगा नाही. पण तुम्ही नांदेडच्या मंडळींनी लोकसभेत चूक केली होती, आता भाजपच्या सर्व उमेदवारांना विजयी करून ती चूक सव्याज दुरुस्त करा, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी लोकसभेप्रमाणेच राजकीय विश्लेषकांचे अंदाज खोटे ठरतील आणि भाजपलाच पूर्ण बहुमत मिळेल, असा दावा त्यांनी केला.
उस्मानाबादच्या सभेत त्यांनी राष्ट्रवादीवर टीका केली. मागील १५ वर्षांत सत्तेवर असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने काय दिवे लावले, तुमचे कल्याण केले का, असा सवाल करीत त्यांना सत्तेवरून खेचा, असे ते म्हणाले. आता भ्रष्टाचारवादी लोकांना महाराष्ट्रात जागा नाही. राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनाही तेच जबाबदार आहेत. जातिवाद, प्रांतवाद एवढेच नव्हे, तर काका-पुतण्यालासुद्धा विसरून भाजपला बळ द्यावे, असे मोदी म्हणाले.
तुळजाभवानी माता ही सर्व राष्ट्रभक्तांची कुलस्वामिनी आहे. भाविकांची संख्या लक्षात घेता तुळजापूरला अपेक्षित सुविधा निर्माण करण्यात हे सरकार अयशस्वी ठरले. तुळजापूर, सोलापूर, रेल्वे मार्गासाठी आíथक तरतूद केली. त्यामुळे तुळजापूर हे देशातील श्रद्धेचे केंद्र बनेल. पुढील काळात हे तीर्थक्षेत्र देशाशी जोडण्यासाठी, पर्यटन व्यवसायाला वृद्धी देण्यासाठी अनेक योजना जगदंबेच्या चरणी अर्पण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.