एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यातला वाद गेल्या काही महिन्यांपासून सुरूच आहे. सध्या तरी तो थंडावला असला तरी आता पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे. कारण या दोघांचा वाद आता थेट वाशिम जिल्हा न्यायालयात पोहोचला आहे.

नवाब मलिक यांनी गेल्या काही दिवसांपासून समीर वानखेडे यांच्या जातीबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे हा वाद उद्भवल्याचं चित्र आहे. समीर वानखेडे यांचे चुलत भाऊ संजय वानखेडे यांनी मलिक यांच्यावर अॕट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करावे अशी मागणी केली होती. त्याअंतर्गत वाशिम जिल्हा न्यायालयाने नवाब मलिक यांनी १३ डिसेंबरला हजर राहून बाजू मांडावी असा आदेश दिला आहे.

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी काही आरोप केले होते. त्यांनी या सर्व प्रकरणामागे भाजपा नेते मोहित कंबोज यांचा हात असल्याचा दावा केला होता. त्यानंतर कंबोज यांनी मलिकांवर मानहानीचा दावा केला होता. त्यानंतर मलिकांना १५ हजाराचा वैयक्तिक जामीनही मिळाला होता.

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांच्यावर कुटुंबियांवर समाज माध्यमांवरून तसेच पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले होते. त्यामुळे ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत मलिक यांच्याविरोधात सव्वा कोटी रूपयाच्या नुकसान भरपाईचा दावा ठोकला. मात्र उच्च न्यायालयाच्या एकलपीठानं नवाब मलिक यांना बोलण्याचा अधिकार असल्याचं स्पष्ट करत वानखेडे यांची विनंती फेटाळून लावली.