त्रिपुरा राज्यात झालेल्या अत्याचाराविरोधात १२ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर १५ ते २० हजार जणांनी निषेध मोर्चा काढला. या मोर्चाला हिंसक वळण लागले. यात दुकानांची तोडफोड, काहींना मारहाण झाल्याने शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. यानंतर १३ नोव्हेंबरला भाजपाने अमरावती बंदची हाक दिली. या बंदलाही हिंसक वळण लागलं. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाष्य केलं असून त्यांनी भाजपावर काही गंभीर आरोप केले आहेत.

नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना मलिक म्हणाले, “भाजपने बंदच्या आडून सुनियोजितपणे दंगली भडकवण्याचं काम केलं. पोलिसांनी हा कट उधळून लावला. राज्यात दंगल घडवण्याचे भाजपचे षडयंत्र होते. राज्यातील जनतेने संयम राखला. त्यामुळे राज्यात इतर ठिकाणी दंगली भडकल्या नाहीत. अमरावती सोडून कुठेच काही घडलं नाही. अमरावतीत कोणत्याही दोन समुदायात दंगल झाली नाही. भाजपाचे नेते अनिल बोंडे यांनी २ तारखेच्या रात्री दंगलीचं षडयंत्र रचलं. दारु वाटली गेली, पैसे वाटण्यात आले आणि दंगली भडकावल्या गेल्या. अशी माहिती पोलीस चौकशीत मिळाली आहे. सर्व अस्त्र संपल्यानंतर भाजप दंगलीचं राजकारण करत असते. भाजपाचे लोक जाणकार आहेत. त्यामुळे ते काहीही करू शकतात.

मलिक पुढे म्हणाले, दंगलीप्रकरणी राष्ट्रवादीच्या मालेगावातील नगरसेवकावर गुन्हा दाखल केला असल्याचं सांगितलं जात आहे. ते काही खरं नाही. आमदार मुफ्ती यांनी २०१४ची निवडणूक राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढली होती. त्यांच्यासोबत आलेल्या नगरसेवकांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. नंतर काँग्रेससोबत राष्ट्रवादीची युती झाली. त्यामुळे मालेगाव मतदारसंघ काँग्रेसकडे गेल्याने मुफ्ती हे एमआयएमसोबत गेले. त्यांच्यासोबत इतर नगरसेवकही गेले. कागदपत्रावर ते राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत. पण प्रत्यक्षात ते एमआयएममध्ये आहेत. त्यापैकी एका नगरसेवकावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे तो राष्ट्रवादीचा नगरसेवक आहे हे म्हणणं योग्य नाही.