देवेंद्र फडणीस हे राज्यातील ड्रग्जच्या उद्योगांचे मास्टर माइंड आहेत, असा धक्कादायक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रग्ज प्रकरणातील सहभागाचा सीबीआय आणि इतर केंद्रीय मंत्री संस्थांच्या माध्यमातून तपास केला जावा अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे. तसेच फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनीच एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंची बदली केली असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. त्यावर मलिकांनी दिवाळीपूर्वी लवंगी फटाका फोडलाय, दिवाळीनंतर मी बाँब फोडणार आहे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

त्यानंतर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत नवाब मलिकांवर टीका केली आहे. नवाब मलिक समीर वानखेडेंवर जे आरोप करत आहेत त्याच्यातून येणाऱ्या परिणांमांची काळजी करावी पण भाजपाला आणि देवेंद्र फडणवीस यांना यामध्ये ओढण्याचे परिणाम खूप भोगावे लागतील असा इशारा चंद्रकांत पाटलांना दिला आहे.

“नवाब मलिक समीर वानखेडेंवर जे आरोप करत आहेत त्याच्यातून येणाऱ्या परिणांमांची काळजी करावी पण भाजपाला आणि देवेंद्र फडणवीस यांना यामध्ये ओढण्याचे परिणाम खूप भोगावे लागतील. ज्यावेळी पुराव्याशिवाय बोलतो तेव्हा पुरावे नाही सापडले तर जी स्थिती होते ती फार वाईट असते. महाविकास आघाडी प्रत्येकवेळी असा चेहरा उभा करत आहे ज्यातून मूळ सामान्यांच्या प्रश्नांपासून लोकांचे लक्ष विचलित करण्याचे काम सुरु आहे. महाराष्ट्रात महापूरामुळे पीक, जमिन वाहून गेली, महिलांवरील अत्याचारांचे गुन्हे नोंदवले जात आहेत. या प्रश्नांवर बोलण्यासाठी त्यांच्याकडे काही नसल्यामुळे अशा प्रकारचे बेछूट आरोप करण्याचा प्रयत्न चालला आहे. मंत्रीमंडळातील अर्ध्ये मंत्री गायब तरी आहेत किंवा त्यांच्यावर आरोप तरी आहेत. अनिल देशमुखांची काळजी करण्याआधी ते वानखेडेंची काळजी करायला लागले आहेत. वानखेडेंच्या मागे समाज पूर्णपणे ठामपणे उभा राहिल. भाजपा अन्याविरुद्ध संघर्ष करणाऱ्यासोबत आहे,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

नीरज गुंडे सामाजिक कार्यकर्ता आहे पण तुम्हाला पुरावे सापडले असतील तर चौकशी करा. संजय राऊत कमी पडत आहेत म्हणून नवाब मलिक जोडले गेले आहेत का?, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. “गेल्या १९ महिन्यात तुम्ही कोणाचीही चौकशी करू शकले नाहीत. उलट तुमच्या मंत्र्यांना राजीनामे करावे लागले. धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला नाही पण लोकांमध्ये घरोघरी त्यावर चर्चा होते. १९ महिन्यात तुम्ही आमचे काही करु शकले नाहीत,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.