राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित गडचिरोलीच्या दौऱ्यावर असतानाच याठिकाणी नक्षलवादी अक्षरश: थैमान घालत आहेत. या नक्षलवाद्यांनी तिघांची हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. यापैकी एक मृतदेह काल पोलिसांना मिळाला होता, तर आज आणखी दोन मृतदेह पोलिसांना आढळून आले. दरम्यान, नक्षलवाद्यांनी काल कोठी पोलीस ठाण्यातून बंडू वाचामी या पोलीस कर्मचाऱ्याचे अपहरण केले होते. पोलिसांना आढळून आलेल्या मृतदेहांमध्ये बंडू वाचामी यांचा समावेश आहे किंवा नाही, याची माहिती अद्याप कळालेली नाही. मात्र, नक्षलवाद्यांनी त्याला ठार मारल्याचा संशय कालपासूनच व्यक्त करण्यात येत होता. गुरुवारी रात्री गुंडूरवाही येथून त्यांचे अपहरण करण्यात आले होते. याबद्दल पोलिसांना माहिती मिळाल्यावर तातडीने त्यांचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली होती. प्रवीण दीक्षित गडचिरोलीच्या दौऱ्यावर असतानाच नक्षलवाद्यांनी हे कृत्य केले आहे. या घटनेनंतर नक्षलग्रस्त भागातील सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली आहे.