देशात लोकसभेची निवडणूक एकूण सात टप्प्यांत होत आहे. यातील पाच टप्प्यातील मतदान झालं आहे. लोकसभा निवडणुकीचा ४ जून रोजी निकाल लागणार आहे. मात्र, त्याआधीच मावळमध्ये महायुतीत वादाची ठिणगी पडल्याची चर्चा रंगली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदावर श्रीरंग बारणे यांनी माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी महायुतीचा धर्म पाळला नसल्याचा आरोप केला. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते उमेश पाटील यांनी प्रतिक्रिया देत ज्यावेळी युतीच्या माध्यमातून निवडणुका लढवल्या जातात, त्यावेळी अशा पद्धतीचं थोडंफार उन्नीस बीस होतं, असं म्हटलं आहे.
उमेश पाटील काय म्हणाले?
“मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी एका मुलाखतीत म्हटलं की, त्या ठिकाणच्या काही स्थानिक कार्यकर्त्यांनी मनापासून काम केलं नाही. त्या कार्यकर्त्यांची यादी त्यांनी अजित पवार यांना दिली आहे. त्यांनी असंही म्हटलं की, त्या भागातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सर्व पदाधिकारी आमदार हे मनापासून काम करत होते. एवढंच नाही तर अजित पवार यांनीही स्वत: बैठक घेऊन कार्यकर्त्यांना कामाला लावलं होतं. बारामतीच्या निवडणुकीत ते व्यस्त असतानाही त्यांनी वेळ दिला होता. एवढं सर्व असताना महायुतीत तीन पक्ष एकत्र आहेत. त्यामुळे काही स्थानिक कार्यकर्त्यांत काही प्रमाणात नाराजी असू शकते”, असं उमेश पाटील यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राजकीय वारस कोण? स्वत:च उत्तर देत म्हणाले, “माझा उत्तराधिकारी…”
“काही स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये काही प्रमाणात नाराजी असू शकते. ती देखील दूर करण्याचा प्रयत्न पार्थ पवार आणि अजित पवार यांनी प्रयत्न केला होता. आमचे सर्वच पदाधिकारी या निवडणुकीत काम करत होते. सर्वच ठिकाणी जेथे-जेथे महायुतीचे उमेदवार आहेत, त्या ठिकाणी अशा पद्धतीचं थोडंफार उन्नीस बीस झालेलं असतं. ज्यावेळी आघाडी किंवा युतीच्या माध्यमातून निवडणुका लढवल्या जातात तेव्हा हे स्वीकारावं लागतं. तरीही मावळ मतदारसंघाची परिस्थिती पाहता आणि आमच्या कार्यकर्त्यांनी दिलेला रिपोर्ट पाहता श्रीरंग बारणे विजयी होतील”, असं उमेश पाटील यांनी म्हटलं आहे.
श्रीरंग बारणे काय म्हणाले होते?
“मावळ लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी महायुतीचा धर्म पाळला नाही. काही कार्यकर्त्यांनी ताकदीने काम केलं नसल्याचा आरोप खासदार श्रीरंग बारणे यांनी केला. ज्यांनी काम केलं नाही, त्यांची नावे अजित पवार यांच्याकडे दिल्याचेही त्यांनी सांगितले.
© IE Online Media Services (P) Ltd