कोरेगाव-भीमा येथे विजय स्तंभाच्या दर्शनासाठी लोक जमायचे. स्थानिक आणि बाहेरुन येणाऱ्या लोकांनामध्ये कधी कटुता नव्हती. पण संभाजी भिडे यांनी कोरेगाव-भीमामध्ये वेगळ वातावरण तयार केलं असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. ते मंगळवारी कोरेगाव-भीमा आणि एल्गार परिषदेसंबंधीच्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

कोरेगाव-भीमाच्या लढाईत काही भारतीय ब्रिटिशांच्या बाजूने लढले. या लढाईत पेशव्यांचा पराभव झाला हे वास्तव आहे. एल्गार परिषद आणि कोरेगाव-भीमा या दोन वेगवेगळया घटना आहेत. एल्गार परिषदेत १०० पेक्षा जास्त संघटना सहभागी होत्या असे शरद पवार म्हणाले.

“एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा यांचा संबंध नाही. त्यासंबंधीचा अहवाल पोलिसांनी दिला आहे. एल्गार परिषदेत काही भाषणं केली गेली. १०० पेक्षा अधिक संघटनांचा सहभाग होता. अध्यक्षपद पी.बी सावंतांकडे होतं. पण ते न आल्यानं प्रकाश आंबेडकरांनी अध्यक्षपद भूषवलं. अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. पण, हजर नसलेल्या लोकांवर पोलिसांनी खटले भरले आणि आणि त्यांना तुरूंगात टाकलं,” असं आरोप पवार यांनी केला.