भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे महाराष्ट्र दौऱ्यावर असताना त्यांनी लोकसभेच्या ४५ तर लोकसभेच्या २०० जागा जिंकण्याचा संकल्प केला. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या समन्वयाने लोकसभेत घवघवीत यश मिळवू असे ते म्हणाले. नड्डा यांच्या घोषणेबद्दल आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांना विचारले असता त्यांनी आपल्या मिश्किल शैलीत टोला मारत सांगितले की, "महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. नड्डा यांनी तीन जागा कमी सांगितल्या असून त्यांनी ४८ जागा जिंकाव्यात. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत." हे ही वाचा >> "छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणायचे असेल तर…", शरद पवार यांचे मोठे वक्तव्य बारामती मधील सेंट्रल ऑफ एक्सलन्स फॉर डेअरीची पाहणी करण्यासाठी आज शरद पवार आले होते. यावेळी त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे, राजेंद्र पवार, पार्थ अजित पवार देखील उपस्थित होते. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांना जेपी नड्डा यांच्या घोषणेबद्दल विचारण्यात आले होते. शरद पवार म्हणाले की, भाजपने खरंतर मिशन ४८ ठरवायला हवं होतं. राज्यात ४८ जागा आहेत. त्यांनी मिशन ४५ करुन चूक केल्याचा टोलाही शरद पवारांनी लगावला. तसेच राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या राज्यात म्हणजेच हिमाचल प्रदेशमध्ये काल परवाच निवडणूक पार पडली. त्यांच्या हातातली सत्ता लोकांनी काढून घेतली. भाजपच्या राष्ट्राध्यक्षांना स्वतःच्या राज्यात पक्षाची सत्ता असताना तसेच केंद्रीय सत्तेचे पाठबळ असताना सत्ता टिकवता आली नाही. त्यामुळे त्यांनी अन्य ठिकाणी जाऊन केलेल्या वक्तव्याची नोंद किती गांभीर्याने घ्यायची? असा प्रश्नही पवार यांनी उपस्थित केला. तसेच भाजपाकडून लव्ह जिहादवर कायदा व्हावा यासाठी मोर्चे काढले जात आहेत. यावर बोलताना ते म्हणाले की, आज केंद्र आणि राज्यात भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे लव्ह जिहाद प्रकरणावर ते कायदा करु शकतात. त्याबद्दल मोर्चे काढण्याची गरज काय? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी सरकारने कायदा बनवावा, अशी सूचना त्यांनी दिली.