पंतप्रधान मोदींनी 'अब की बार मोदी सरकार'चा नारा देऊन वर्षाला कोटींमध्ये रोजगार आणण्याचे आश्वासन दिल्यापासून देशातील युवक एक कोटी रोजगाराच्या शोधात वणवण भटकत आहेत अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. खुद्द पंतप्रधानांच्याच कार्यालयात २६ टक्के पदं रिकामी आहेत असे म्हणत आगामी निवडणुकीत मोदी सरकारला विरोधी बाकावर बसवल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे. “निवडणुकांच्या तोंडावर कोटी रोजगाराच्या वार्ता! मोदीजी, पण भरती कधी? देशात २०१४ मध्ये आलेल्या मोदी लाटेची आती लोकांच्या डोक्यात तीव्र सणक गेलीय. 'अब की बार मोदी सरकार'चा नारा देऊन वर्षाला कोटींमध्ये रोजगार आणू, असं आश्वासन नरेंद्र मोदी यांनी दिलं होतं. तेव्हापासून युवक एक कोटी रोजगाराच्या शोधात वणवण भटकतायत. एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीच्या एका बातमीत केंद्र सरकारच्या सर्व रिकाम्या पदांचा कच्चा चिठ्ठा देशाच्या जनतेपुढे आणला आहे. मार्च २०२० पर्यंत केंद्र सरकारमध्ये एकूण ८.७२ लाख पदं रिक्त असल्याची माहिती देण्यात आली आहे, “ असे राष्ट्रवादीने ट्विटमध्ये म्हटले आहे. “बातमीनुसार, रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय इतकंच नाही तर खुद्द पंतप्रधान महोदयांच्या कार्यालयात देखील २६ टक्के पदं रिकामी आहेत. ही पदं न भरल्यामुळे देशातील युवकांचा आक्रोश स्वाभाविक आहे. जी पदं भरली जातात त्यासाठी तब्बल तीन वर्षांचा कालावधी जातो. कर्मचारी निवड आयोगाने २०१८ साली ६० हजार पदांची भरती काढली होती. त्यातही ५५ हजार पदं भरून पाच हजार पदं तशीच रिक्त ठेवण्यात आली. नियुक्त झालेल्यांना कामावर पूर्णपणे रूजू होण्यासाठी तीन वर्ष लागली, असे राष्ट्रवादीने काँग्रेसने म्हटले आहे. मोदी सरकारची अशा गतीने कामगिरी सुरू राहिली तर एक कोटी रोजगार देशाला मिळेपर्यंत युवकांच्या अनेक पिढ्या म्हातार्या होतील. सरकारविषयी युवकांमध्ये वाढणारी नाराजी बघता आगामी निवडणुकीत मोदी सरकारला विरोधी बाकावर बसवल्याशिवाय शांत बसणार नाही,” असे ट्विटमध्ये म्हटले आहे.