राज्याचे सामजिक न्यायमंत्री धनजंय मुंडे यांनी करोनावर मात केली असून बीडमधील आपल्या घरी सध्या ते क्वारंटाइन आहेत. लॉकडाउनमध्ये काम करत असताना दोन महिने मी जिल्ह्याबाहेर पडलो नव्हतो. मुंबईतील परिस्थिती किती गंभीर आहे याची बीडमध्ये राहून जाणीव होती. मुंबईत गेलो तरी आपल्याला काही होणार नाही हा अति आत्मविश्वास मला नडला असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी करोनाविरोधात लढ्याचा प्रवास उलगडला.

आणखी वाचा- करोनाचा मानसिक हल्ला होऊ देऊ नका; धनंजय मुंडेंचा मोलाचा सल्ला

दरम्यान धनंजय मुंडे यांनी आपली प्रकृती सध्या चांगली असून आई-वडिलांच्या पुण्याईने मिळालेलं हे नवीन जीवन जनतेच्या सेवेत घालवणार आहे अशा भावना यावेळी व्यक्त केल्या. करोनाची लागण झाल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला आईचा चेहरा दिसला असंही यावेळी धनंजय मुंडे यांनी सांगितलं. काही झालं तरी घऱात एकुलता एक मुलगा असल्याने आणि तिने खूप कष्ट घेऊन मोठं केलं आहे. पण तिच्यामुळेच आपल्याला लढायचं बळ मिळालं असंही धनंजय मुंडे यांनी यावेळी सांगितलं.

आणखी वाचा- “करोना झाल्याचं समजताच पंकजा यांचा फोन आला आणि म्हणाल्या…”; धनंजय मुंडेंनी सांगितली आठवण

पंकजा मुंडे यांनी फोन केल्यासंबंधी बोलताना धनंजय मुंडे यांनी सांगितलं की, “२०११-१२ पासून आमच्या कुटुंबात फारसा संवाद नव्हता. एखादी दु:खाची घटना असेल तर आम्ही एकत्र आलो आहोत. मला करोना झाल्याचं कळाल्यानंतर त्यांनी मला फोन केला. चार-पाच वेळा त्यांनी माझी चौकशी केली. मी बरा व्हावा यासाठी सदिच्छाही व्यक्त केली. कुटुंबात दोन राजकीय विचारधारा याआधीही आल्या आहेत. पण कुटुंब वेगळं ठेवलं पाहिजे अशी माझी नेहमी इच्छा राहिली आहे. त्या इच्छेला अनुसरुन माझ्या आजारपणाच्या काळात बहिणीने फोन केला, सदिच्छा व्यक्त केली, याचा आनंद वाटला. ज्याच्याशी इतकं वर्ष बोलणं नाही त्याने फोन करुन प्रकृतीसाठी सदिच्छा व्यक्त करणं यामुळे नक्कीच फरक पडतो”.