हर्षद कशाळकर, लोकसत्ता अलिबाग- जिल्ह्याचे खासदार राष्ट्रवादी काँग्रेसचे, पालकमंत्रीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या मात्र तरीही रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला पूर्णवेळ जिल्हाध्यक्ष मिळू शकलेला नाही. गेली दोन महिने प्रभारी जिल्हाध्यक्षावर पक्षाचा कार्यभार देण्याची वेळ पक्षनेतृत्वावर आली आहे. नाराज असलेल्या माजी आमदार सुरेश लाड यांची मनधरणी करण्यात तटकरे यांना यशस्वी झाले असले तरी लाडांच्या राजिनाम्यामुळे रिक्त झालेल्या जिल्हाध्यक्षसाठी उत्तराधिकारी शोधण्यात तटकरेंना यश आलेले नाही. काय घडले- काय बिघडले आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची परिवार संवाद यात्रा एप्रिल महिन्यात पार पडली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जिल्ह्यातील सातही मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला. कार्यकर्त्यांना जोमाने काम करण्याचा सल्लाही दिला. ही परिवार संवाद यात्रा कर्जत येथे असतानाच सुरेश लाड यांनी आपला राजीनामा प्रदेशाध्यक्षांकडे पाठवून दिला. या राजीनाम्यानंतर ते बरेच दिवस अज्ञातवासात होते. पक्षांतर्गत नाराजीमुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा बरेच दिवस सुरु होती. ते भाजपच्या वाटेवर असल्याच्या वावडय़ाही उठल्या होत्या. लाड यांना महामंडळाचे अध्यक्षपद देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन करावे अशी मागणीही कर्जत मधील कार्यकर्त्यांनी केली होती. या नाराजी नाटय़ादरम्यान अखेर प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत तटकरे यांनी महामंडळावरील नियुक्त्या जेव्हा होतील त्यात पहिले नाव सुरेश लाड यांचे असेल असे आश्वासन दिले होते. त्यानंतरही लाड हे बरेच दिवस पक्षापासून अलिप्त होते. अखेर सुनील तटकरे यांनी लाड यांची घरी जाऊन भेट घेतली, आणि मनधरणी केली. या मनधरणीनंतर अलिबाग येथे राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा कार्यकारिणीची बैठक पार पडली. नाराजीनाटय़ानंतर या बैठकीला सुरेश लाड हे देखील उपस्थित राहिले, आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षांतर्गत वादळाचा एका अंकावर पडदा पडला. या बैठकीनंतर लाडांची नाराजी दूर झाल्याचे सांगण्यात आले. पत्रकार परिषद घेऊन लाड यांनी आपण पक्षातच राहणार असल्याचे जाहीर केले. कोंढाणे धरणाचे पाणी स्थानिकांना मिळावे यासाठी आपण राजीनामा दिल्याचे त्यांनी यावेळी सांगतले. या संदर्भात मुंबईत बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल. धरणाच्या पाण्यावर स्थानिकांनाही अधिकार देण्याबाबत आग्रही भुमिका घेतली जाईल असे सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगून टाकले. मात्र याचवेळी माजी आमदार सुरेश लाड यांनी दिलेला जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा स्वीकारला असल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी जाहीर केले. रोह्याच्या मधुकर पाटील यांच्याकडे तात्परता कार्यभार सोपविण्यात आला. वास्तविक पाहता जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत लाडांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर नवीन जिल्हाध्यक्षाची निवड होणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. इथेच पक्षांतर्गत नाराजीचा दुसरा अंक सुरु झाला. लाडांच्या नाराजीनाटय़ामुळे रिक्त झालेले जिल्हाध्यक्ष पद अजूनही भरले गेलेले नाही. गेले दोन महिने पक्षाकडे पूर्णवेळ जिल्हाध्यक्ष उपलब्ध नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांची मोठी पंचाईत झाली आहे. संभाव्य राजकीय परिणाम.. रायगड जिल्ह्यात कर्जत आणि श्रीवर्धन या दोन विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे. महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर कर्जत मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची मोठी कोंडी झाली आहे. कारण शिवसेना हा राष्ट्रवादीचा मतदारसंघातील प्रमुख प्रतिस्पर्धी राहिला आहे. आता ज्या शिवसेनेविरोधात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सातत्याने दोन हात केले त्याच्याशी जुळवून घेण्याचा सल्ला पक्षाकडून दिला जात आहे. हेच लाड आणि त्यांच्या सहकाऱ्याच्या अस्वस्थतेचे मूळ कारण आहे. भविष्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी कायम राहिली तर त्याचा मोठा फटका मतदारसंघातील संघटनेवर होणार आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्षपदासह महामंडळाचे अध्यक्षपद मतदारसंघात असावे यासाठी कार्यकर्ते आग्रही आहेत.