रायगड जिल्ह्यात सहा नगरपंचायतीसाठी झालेल्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनी वर्चस्व राखले. भाजपाने सहा जागा जिंकत चंचूप्रवेश केला. तर शेकापची पिछेहाट झाली. काँग्रेस मतदारांवर फारसा प्रभाव दिसून आला नाही. जिल्ह्यातील खालापूर, पाली, माणगाव, तळा, म्हसळा आणि पोलादपूर नगरपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रीया गुरुवारी पार पडली. १०२ जागांसाठी झालेल्या या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसने ३८, शिवसेनेनी ३५, शेकापने १२, काँग्रेसने ८, भाजपाने ६ तर इतर ३ उमेदवार विजयी झाले. पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या मतदारसंघातील तळा आणि म्हसळा या दोन नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व राखत सत्ता मिळवली. मात्र माणगाव नगरपंचायतीत राष्ट्रवादीला धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले.तळा नगरपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेकडून हिसकाऊन घेतली. मात्र माणगाव नगरपंचायत राखण्यात राष्ट्रवादीला अपयश आले. येथे शिवसेना प्रणित माणगाव विकास आघाडीने राष्ट्रवादीला धक्का दिला. खरे तर खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे तिघेही माणगाव मध्ये तळ ठोकून बसले होते. पोलादपूर नगरपंचायत राखण्यात शिवसेनेला यश आले. पहिल्यांदाच निवडणूक झालेल्या पाली नगरपंचायतीवर राष्ट्रवादी आणि शेकाप आघाडीने वर्चस्व राखले. तर खालापूर मध्ये काहीशी त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे. येथे सत्ता मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची मदत निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे शिवसेना आणि शेकापला राष्ट्रवादीची दोन मतांसाठी गळ घालावी लागणार आहे. फारसे अस्तित्व नसलेल्या भाजपाने या निवडणकीत चंचू प्रवेश केला आहे. पक्षाचे तळा येथे ३, पाली येथे २ तर पोलादपूर येथे १ नगरसेवक निवडून आला आहे. तर तळा नगरपंचायतीत शिवसेनेच्या पराभवाला भाजप कारणीभूत ठरला आहे. निवडणूकीत मतदारांवर फारसा प्रभाव पाडण्यात काँग्रेसला यश आलेले नाही. तर शेकापची पिछेहाट याही निवडणूकीत दिसून आली आहे. शेकापची एकहाती सत्ता असलेल्या या नगरपंचायतीत शिवसेनेचे आठ तर राष्ट्रवादीचे २ उमेदवार विजयी झाले आहेत.