पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार की नाही? याविषयी अद्याप ठोस अशी भूमिका आघाडी म्हणून समोर आलेली नाही. आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र लढायला हवं, अशी अपेक्षा व्यक्त करत असले, तरी त्यासंदर्भात घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. मात्र, असं असताना दुसरीकडे मविआतीलच काही नेतेमंडळी एकमेकांविरोधात टीका-टिप्पणी करताना दिसत आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीसंदर्भात टिप्पणी केली असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार अमोल मिटकरी यांनी त्यावर प्रत्युत्तर दिलं आहे. "वाचाळवीरांना आवर घाला" आमदार अमोल मिटकरी यांनी उद्धव ठाकरेंना उद्देशून केलेल्या ट्वीटमध्ये वाचाळवीरांना आवर घालण्यासंदर्भात इशारा दिला आहे. "आदरणीय उद्धवजी. आपल्याबद्दल आमच्या मनात नितांत आदर आहे. विनंती ही आहे की आपल्या पक्षातील वाचाळवीरांना आवर घालावा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संकटकाळात आपल्यासोबत उभा राहिलाय. गल्लीतल्या टुकार 'दादाहो', राष्ट्रवादी पक्षाबद्दल बोलत असतील, तर आम्हालाही व्हिडीओ लावावे लागतील", असं अमोल मिटकरींनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. "कुणीही ऊठसूट बोलत असेल, तर…" दरम्यान, यासंदर्भात माध्यमांशी बोलताना अमोल मिटकरींनी सविस्तर भूमिका मांडली आहे. "महाविकास आघाडीतला मी एक घटक आहे. उद्धव ठाकरे, त्यांचा शिवसेना पक्ष आणि त्यांचं मशाल चिन्ह याबद्दल आमच्या मनात आदर आहे. फक्त मी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना विनंती केली आहे की कृपा करून ज्या सभा होतील त्यात ज्यांच्याविरुद्ध लढायचं आहे, त्यांच्यावरच तुमच्या लोकांनी बोलावं. राऊत बोलतायत डीएनए चेक करा. आणखी कुणी अजित दादांच्या पहाटेच्या शपथविधीचा व्हिडीओ लावतंय. असं कुणीही उठसूट बोलत असेल, तर शेवटी आम्हालाही मर्यादा आहेत. आम्हालाही पक्षाची संस्कृती आहे. पण शेवटी आम्ही ती किती दिवस पाळायची?" असा प्रश्न अमोल मिटकरींनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे. “कर्नाटक पराभवाची चर्चा कमी करण्यासाठी एका रात्रीत…”, ठाकरे गटाचा मोदींवर गंभीर आरोप "तोंड आम्हालाही आहे, आम्ही तुमचा…" "आमची विनंती आहे. अजितदादा, पक्षावर आणि पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांवर जर तुमचे वक्ते बोलण्याचा प्रयत्न करतील तर आम्हीही तितक्याच ताकदीने बोलू. त्याचे परिणाम काहीही झाले, तरी आम्ही मागेपुढे पाहणार नाही. त्यामुळे आमची विनंती आहे की कृपया अशा लोकांना आवरा. तोंड आम्हालाही आहे. आम्ही तुमचा, मातोश्रीचा, तुमच्या पक्षाचा आदर करतो. पण अशा लोकांमुळे पक्ष बदनाम होत असेल, तर कृपया या लोकांना आवर घालावा", असं मिटकरी म्हणाले.