राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दोन महिन्यांनी येत असलेलं केंद्राचं पथक म्हणजे पेशंट दगावल्यावर डॉक्टर येणं असला प्रकार आहे. केंद्र सरकारने अन्नदात्याची अशी चेष्टा करु नये. आता पथक नको तर मदत पाठवा असं ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. केंद्राचं पथक राज्यात आत्ता पाहणीसाठी येतं आहे. राज्यातील अतिवृष्टीला दोन महिने उलटून गेले आहेत. त्यानंतर केंद्राचं पथक पाहणीसाठी येतं आहे यावरुन आता रोहित पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

२१ डिसेंबर ते २६ डिसेंबर या दरम्यान केंद्राचं पथक राज्यात आहे. ऑक्टोबर महिन्यात जो पाऊस झाला आणि त्यामुळे शेतकऱ्याचं जे नुकसान झालं त्याची पाहणी करायला हे पथक आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २३ ऑक्टोबरला जनतेला संबोधित करताना सांगितलं होतं की अवकाळी पावसामुळे राज्यातील ४१ लाख हेक्टवरील क्षेत्राचं नुकसान झालं आहे आम्ही केंद्राला तीनवेळा विनंती केली होती. मात्र पथक आलं नाही असं त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं. आता केंद्र सरकारचं पथक राज्यात दाखल झालं आहे. त्यावरुन आता रोहित पवार यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

केंद्राच्या पथकाने आता पाहणी करुन काहीही फायदा नाही. दोन महिन्यांपूर्वी जो कापूस खराब झाला होता तो आता भुईसपाट झाला आहे. बाजरीचं काढून आता लोकांनी गहू पेरला आहे. त्यामुळे या पथकाला नुकसान कसं दिसणार? असा प्रश्न औरंगाबादच्या शेतकऱ्यांनी विचारला आहे. दरम्यान आजच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही केंद्र सरकारच्या पथकावर टीका केली आहे. केंंद्राचं पथक आज शिवारात जाऊन काय पाहणार असा प्रश्न राजू शेट्टी यांनी विचारला आहे. त्यानंतर आता रोहित पवार यांनीही केंद्राच्या पथकावर टीका केली आहे.