३५०व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सत्ताधारी पक्षातील अनेक नेतेमंडळी उपस्थित होती. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरेही उपस्थित होते. मात्र, शिवराज्याभिषेक सोहळा अर्ध्यावर आलेला असताना तो सोडून सुनील तटकरे माघारी आले. खाली उतरल्यानंतर टीव्ही ९ ला दिलेल्या प्रतिक्रियेत सुनील तटकरेंनी यामागचं कारण सांगितलं. तसेच, शिवराज्याभिषेक सोहळ्याचं राजकीयीकरण केल्याचा आरोपही त्यांनी केला.
“माझी संधी का डावलली गेली?”
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या विधींनंतरचा कार्यक्रम राजकीय होता, असं सुनील तटकरे आपल्या प्रतिक्रियेत म्हणाले आहेत. “आज मी एक शिवभक्त नागरिक म्हणून इथे आलो होतो. शिवराज्याभिषेक सोहळा पूर्ण होईपर्यंत मी शिवभक्त मावळा म्हणून उपस्थित होतो. पण नंतरचा कार्यक्रम जरा राजकीय होता. मी या विभागाचं लोकसभेत प्रतिनिधित्व करतो. एक शिवभक्त म्हणून माझ्या भावना छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण करण्याची राजशिष्टाचारानुसार असणारी माझी संधी का डावलली गेली? मला माहिती नाही”, असं सुनील तटकरे यावेळी म्हणाले.
“त्यामुळे पुढचा कार्यक्रम राजकीय विचारांचा असेल असं समजून मी तिथून निघालो. एक शिवभक्त म्हणून तिथे झालेल्या ऐतिहासिक सोहळ्याला मी उपस्थित होतो”, असंही तटकरे म्हणाले.
“राज्य सरकारकडून होणाऱ्या कार्यक्रमांत एक राजशिष्टाचार असतो. पण आज माझ्यासाठी तो राजशिष्टाचार महत्त्वाचा नाही. कारण मी एक शिवभक्त मावळा म्हणून इथे उपस्थित होतो. मात्र त्यानंतरही एखादा राजकीय विचार धरून एखादी कृती सुरू झाल्याचं जाणवलं, तेव्हा मला वाटलं की शिवप्रभूंना वंदन करावं आणि इथून जावं”, अशा शब्दांत सुनील तटकरेंनी आपली नाराजी बोलून दाखवली.
“स्वयंघोषित स्वागताध्यक्षांचे विचार मी ऐकले”
“मीही एक स्वाभिमानी असून रायगडचाच असल्यामुळे तिथून आपण निघावं असं मला वाटलं. हा एक सोहळा आहे. त्याला कोणत्याही प्रकारे गालबोट लागेल, असं कोणतंही कृत्य माझ्याकडून होणार नाही. आधीच स्वयंघोषित स्वागताध्यक्षांचे विचार मी ऐकले. त्यामुळे पुढे फारसं काही आहे असं मला वाटलं नाही”, असं सुनीूल तटकरे म्हणाले.
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp mp sunil tatkare slams shiv rajyabhishek program on raigad pmw