विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसून स्वराज्यरक्षक असल्याचा उल्लेख विधानसभेत केला. त्यानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले. भाजपाने आक्रमक पवित्रा घेत राज्यभर आंदोलन केले. या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी भूमिका व्यक्त केल्यानंतर आता अजित पवारांच्या भगिनी आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अजित पवार यांचे भाषण शांतपणे ऐका त्यात त्यांचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता, असे स्पष्टीकरण सुप्रिया सुळे यांनी दिले आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच असे झाले असेल की सत्तेमध्ये बसलेले लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. पण एका गोष्टीचं वाईट वाटतं की, एखादं वक्तव्य झालं असेल तर इतिहास तज्ज्ञांचे शिबिर भरवून त्यावर चर्चा व्हायला हवी." तर भाजपनेही आमच्यासोबत आंदोलनाला उतरावे "आपल्याला हे विसरुन चालणार नाही की आपण सर्व लोकप्रतिनिधी आहोत. बेरोजगारी आणि महागाईसारखे गंभीर प्रश्न आपल्यासमोर उभे आहेत. माझी भाजपाला विनम्रपणे विनंती राहिल. तुम्ही संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार आंदोलन केले. तो तुमचा अधिकार आहे. पण सत्तेत असताना रस्त्यावर उतरतो, हे मी पहिल्यांदाच पाहिलं. जेव्हा अजित पवार बेरोजगारी आणि महागाईवर बोलतात, तेव्हा त्या विषयातही आमच्यासोबत आंदोलनाला उतरावे", असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. अवमानकारक वक्तव्यावर भाजपाची दुटप्पी भूमिका भाजपाच्या नेत्यांकडून काही चुकीचे वक्तव्य होते, तेव्हा मात्रा भाजपा दुटप्पी भूमिका घेतो. राज्यपाल, मंत्री, भाजपाचे महामंत्री जेव्हा महापुरुषांचा अवमान करतात, तेव्हा भाजपाकडून निषेध व्यक्त केला जात नाही. अजित पवार यांनी काही चुकीचे वक्तव्य केलेले नाही. त्यांचे भाषण तुम्ही शांतपणे ऐकले तर त्यांच्या मनात कुठलाही अवमान करण्याचा हेतू नव्हता, हे अर्थातच दिसून येत आहे. पण स्वतःकडे कुठलाच विषय नाही आणि महागाई व बेरोजगारी कमी करण्यात अपयश आल्यामुळे ते अजितदादांवर आरोप करुन असे आंदोलन करत आहेत, हे दुर्दैव असल्याचे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. बारामतीत कुणीही आले तर त्यांचे स्वागत बारामतीत केलेले काम पाहण्यासाठी कुणीही आले तरी त्यांचे आम्ही स्वागतच करु. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती, माजी मंत्री अरुण जेटली हे बारामतीत येऊन गेले आहेत. त्यांनी बारामतीमध्ये झालेल्या कामाचे कौतुक केले आहे. आम्ही अतिथी देवो भव: या विचारानुसार वागणारे लोक आहोत. सर्वांचे स्वागतच करु. रोहितच्या मागे उभे राहणाऱ्या कर्जतकरांचे आभार रोहित पवार यांना कर्जतमध्ये संधी दिल्यानंतर कर्जतचा चांगला विकास झाला आहे. बारामतीपासून इथे येईपर्यंत चांगले रस्ते झालेले पाहायला मिळत आहेत. कर्जतकरांनी रोहित पवार यांच्यावर विश्वास टाकला त्याप्रमाणे रोहित पवार चांगले काम करत आहेत, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.