वाढत्या महागाईला रोखण्यात राज्यसरकार आणि केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. जीवनावश्यक वस्तुंच्या वाढत्या किंमतीमुळे जनसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुरुवारी अलिबाग येथे थाळीनाद आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रकाश धुमाळ, जिल्हा संघटक रुषीकांत भगत, अलिबाग मुरुड विधानसभा अध्यक्ष जनार्दन पाटील, अलिबाग तालुका अध्यक्ष मनोज धुमाळ, राजा केणी, संतोष निगडे आदी उपस्थित होते. अलिबाग येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयापासून तहसिलदार कार्यालयावर मोर्चा काढून शासनाच्या उदासिनतेचा निषेध करण्यात आला. त्यानंतर तहसिलदार संकपाळ यांना निवेदन देण्यात आले. तुरडाळ, तेलबिया, कडधान्य, भाजीपाला यांच्या वाढत्या किंमतीत गेल्या वर्षभरात तिपटीने वाढ झाली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या या वाढत्या किमती रोखण्यासाठी तातडीने पाऊले उचलावीत आणि जनसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.