महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा अखेर रविवारी एक मे रोजी औरंगाबादमध्ये पार पडली. सरळ सांगून भोंगे निघणार नसतील तर मग होऊन जाऊ द्या, एकदा अशी आक्रमक भाषा वापरत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दुप्पट आवाजात मशीदींसमोर हनुमान चालिसा वाजविण्याची भूमिका जाहीर केली. येथील सभेत राज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. दरम्यान या टीकेनंतर राष्ट्रवादीकडून पहिली प्रतिक्रिया आली असून राष्ट्रवादीने राज ठाकरेंना लक्ष्य केलंय.

राज शरद पवारांबद्दल काय म्हणाले?
औरंगाबाद येथील सांस्कृतिक मंडळावरील मैदानावरील सभेत बोलताना राज ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात शरद पवार यांनी प्रबोधनकारांची पुस्तके वाचण्याच्या अलिकडेच दिलेल्या टोल्याला उत्तर देत केली. प्रबोधनकारांच्या पुस्तकातील संदर्भ सांगत त्यांनी पवार हे सोयीचे प्रबोधनकार सांगातात. खरे ख्रिश्चन मिशनरींच्या विरोधात हिंदूमशनरी सुरू करणारे ते पहिले होते. त्यांनी धर्मातील अनेक चुकीच्या बाबीवर लिहून ठेवले आहे. पण सोयीने तेवढे पवार सांगातात असे ते म्हणाले. जेम्स लेन प्रकरण पुढे करुन शरद पवार यांनी जातीय व्देष निर्माण केला. त्यांना खरे तर शरद पवार यांना हिंदू शब्दांचीच अलर्जी असल्याची टीका केली. त्यांनी निर्माण केलेली जातीयवादाची तेढ आता महाविद्यालयाच्या स्तरावरही पोहचली आहे. आपण जात- पात मानत नाही. पण राज्यात राष्ट्रवादी कॉग्रेसच्या जन्मानंतरच जातीय तेढ व द्वेष वाढल्याच्या अरोपाचाही त्यांनी पुनरुच्चार केला.

राष्ट्रवादीचं उत्तर
राज यांच्या भाषणावर पहिली प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आणि पक्षाचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेनंतर काही ट्विट्स केले असून यामधून त्यांनी राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडलंय. “राज ठाकरेंचे मूळ दुखणे हे आपला भाऊ मुख्यमंत्री व पुतणे मंत्री झाल्याचे असून, वरून ते पवार साहेबांमुळे (शरद पवारांमुळे) झाले याचे दुःख अजूनचं जास्त आहे. भाऊ मुख्यमंत्री झाल्याच्या त्रासाने होणारी तडफड संपूर्ण देश व महाराष्ट्र बघत आहे,” असा टोला वरपे यांनी लगावला आहे.

अन्य एका ट्विटमध्ये वरपे यांनी, “राज ठाकरे एवढे बेबींच्या देठापासून मोदी सरकारमुळे वाढलेल्या पेट्रोल-डिझेल, महागाई, ढासळलेली अर्थव्यवस्था यावर बोलले असते तर थोडंफार पक्षाकडे मतदान तरी वळले असते. यावरून सुपारी कोणाची आहे हे कळतंय,” असंही म्हटलंय.

पुढील एका ट्विटमध्ये वरपे यांनी राज यांच्या सभेची तुलना जेसीबीचं खोदकाम होण्याशी केलीय. “एखाद्या ठिकाणी जेसीबी काम करायला आल्यावर लोकं जेसीबीला बघायला येतात, त्यांना त्या कामाशी काही देणं घेणं नसते. अगदी तसेच राज ठाकरेंच्या सभेला लोकं जातात, त्यांना ऐकतात पण त्यांच्या मताशी त्यांना काही घेणंदेणं नसते. लोकांचा मूळ उद्देश हा फक्त आणि फक्त टाईमपास असतो,” असं वरपे म्हणालेत.

दरम्यान, या सभेनंतर आता पुन्हा एकदा राज्यामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध मनसे संघर्ष अधिक तिव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. राज ठाकरे यांनी होऊन जाऊ द्या शब्दाचा अर्थ काय हे पोलिसांनी त्यांना विचारावे. अशी भाषा आम्हालाही वापरता येते. पण ती वापरणार नाही.  होऊ जाऊ द्या शब्दाचे अर्थ शासनाने व पोलीस प्रशासनाने राज ठाकरे यांना विचारावेत असे औरंगाबाद खासदार इत्मियाज जलील म्हटले आहेत.