मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क मैदानात झालेल्या मेळाव्यात आक्रमक हिंदूत्वाची भूमिका मांडतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर यथेच्छ टीका केली. शरद पवारांनी १९९९मध्ये राष्ट्रवादीची स्थापना केल्यापासूनच राज्यात जातीपातीचे राजकारण सुरू झाल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी यावेळी केला. यानंतर राज ठाकरे भाजपाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज ठाकरेंना सल्ला दिला आहे.

बाहेरुन आणलेले, आलेले नेते तसंच ज्या पक्षांनी पाठिंबा दिला आहे आणि आधी दिला होता त्या पक्षांना आणि नेत्यांना भाजपा संपवतं असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला आहे. भाजपाजवळ जाताना राज ठाकरेंनी जपून पावलं टाकावीत असा सल्ला रोहित पवारांनी दिला आहे.

काका राज ठाकरेंच्या टीकेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले “मी आधी टाइमपास टोळी म्हणायचो, पण आता बरं वाटतंय की…”

“मुंबईची निवडणूक समोर आल्यानंतर त्यांनी ज्या भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे, त्यावर अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे की या भूमिका भाजपाला पोषक आहे. पण मला जे कळतं त्यानुसार भाजपाची जी स्टाईल आहे त्यानुसार भाजपा फक्त आपलाच विचार करतं. बाहेरुन आणलेले, आलेले नेते, ज्या पक्षांनी पाठिंबा दिला आहे आणि आधी दिला होता त्या पक्षांना आणि नेत्यांना संपवतात. या गोष्टीचा मनसेने विचार करावा,” असा सल्ला रोहित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला आहे.