गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक दिग्गजांनी पक्षाची साथ सोडत शिवसेना भाजपात प्रवेश केला. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का लागला आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी महाराष्ट्र पिंजून काढण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी त्यांनी सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. तसंच त्यांनी पक्षाला रामराम ठोकलेल्या नेत्यांवरही हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्यावरही त्यांचे नाव न घेता टीका केली. तुरूंगात गेलेल्यांनी सांगू नये पवारांनी काय केलं, असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी यावेळी लगावला. शाह यांनी सोलापुरमधील सभेत बोलताना शरद पवार यांच्यावर टीका करत त्यांनी आतापर्यंत काय केलं असं म्हटलं होतं. शरद पवार यांनी सोलापुरात कार्यकर्त्यांना संबोधित केलं. "गेलेल्यांची चर्चा का करायची? गेले ते इतिहासजमा होतील, असे पवार यावेळी म्हणाले. याठिकाणी काँग्रेसला मोठा इतिहास आहे. 1957 मध्येही काँग्रेसचा पराभव झाला असताना सोलापुरात मात्र काँग्रेसला विजय मिळाला होता. परंतु आता काही जणांनी लाचारीच्या रस्त्यावर जाण्याचा निर्णय घेतला असून जनता त्यांना उभं करणार नाही. जे गेले ते इतिहासजमा होती. आता केवळ उगवणाऱ्यांकडेच पहायचं," असं म्हणतं पवार यांनी पक्षांतर केलेल्यांवर टीका केली. "मी 80 वर्षांचा झालो तरी मी काही म्हातारा झालो नाही. या ठिकाणी असलेल्या तरूणांच्या जोरावर अनेकांना आजपर्यंत घरचा रस्ता दाखवला आहे आणि यापुढेही दाखवायचा आहे. आता थांबायचे नसून केवळ विजय मिळवायचा आहे," असं पवार यांनी यावेळी नमूद केलं.