भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी लोकशाहीसाठी काँग्रेस पक्ष मजबूत असणं आवश्यक असल्याचं स्पष्ट मत मांडलं होतं. सलग निवडणुकीत पराभूत होणारी काँग्रेस पुन्हा मजबूत व्हावी आणि पक्षाचे नेते निराश होऊन पक्ष सोडू नयेत, हीच आपली इच्छा असल्याचं गडकरींनी सांगितलं होतं. काँग्रेस पक्ष कमकुवत होत असून देशातील मुख्य विरोधी पक्षाची जागा प्रादेशिक पक्ष घेत आहेत, हे चांगले लक्षण नाही असंही ते स्पष्टपणे बोलले होते. दरम्यान त्यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘काश्मीर फाईल्स’ चित्रपटावर शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले “देशाचे प्रमुखच जर…”
युपीएचं अध्यक्षपद घेणार का? शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले “मी नेतृत्व करण्याची…”
शरद पवार यांनी कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना गडकरींच्या विधानाबद्दल विचारलं असता ते म्हणाले की, “देशात शक्तीशाली विरोधी पक्ष असण्याची गरज आहे. संसदीय लोकशाही मजबूत करायची असते. एकच पक्ष असला की मग ते पुतीनसारखं होईल. रशियाने ठराव केला, चीनने केला. असे पुतीन होऊ नये ही अपेक्षा आहे”.
नितीन गडकरी काय म्हणाले होते –
“लोकशाही दोन चाकांवर चालते- सत्ताधारी आणि विरोधक. प्रबळ विरोधी पक्ष ही लोकशाहीची गरज आहे, त्यामुळे काँग्रेस मजबूत असावी अशी माझी इच्छा आहे. त्याचवेळी काँग्रेस कमकुवत असताना त्याचे स्थान प्रादेशिक पक्ष घेत आहेत, जे लोकशाहीसाठी चांगले नाही. त्यामुळे काँग्रेस विरोधी पक्षाची जागा घेण्यासाठी मजबूत झाला पाहिजे,” अशी इच्छा गडकरींनी बोलून दाखवली.
पराभवानंतर निराश होऊ नका आणि पक्षासोबत राहण्याचे आवाहन त्यांनी काँग्रेस नेत्यांना केलं. ते म्हणाले की, “काँग्रेस मजबूत राहावी अशी माझी मनापासून इच्छा आहे. जे काँग्रेसच्या विचारसरणीचे पालन करतात, त्यांनी पक्षासोबत राहून खंबीर राहावे. पराभवाने खचून न जाता त्यांनी काम करत राहावे. पराभव झाला तर एक दिवस विजयही होणारच”.
यावेळी त्यांनी भाजपाला संसदेत फक्त २ जागा जिंकता आल्याची आठवणही सांगितली. “पण कार्यकर्त्यांच्या मेहनतीने काळ बदलला आणि अटलबिहारी वाजपेयींच्या रूपाने आम्हाला पंतप्रधान मिळाला. अशा परिस्थितीत निराश होऊन आपली विचारधारा सोडू नये,” असं आवाहन गडकरींनी काँग्रेस नेत्यांना केलं.