“रमझानच्या कालावधीमध्ये घरातच थांबून नमाज पठणं करावं. या कालावधीत सरकारनं कोणतीही सुट दिलेली नाही. सर्वांनी आपल्या घरातच नमाज पठण करावं आणि इफ्तार करावं,” असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं. आज (मंगळवार) त्यांनी राज्यातील जनतेशी फेसबुकद्वारे संवाद साधला.

“रमझानसाठी आपण आपल्या घरातच नमाज पठाण करू शकता. सरकारकडून रमझानसाठी सुट देण्यात आलेली नाही. अशी परिस्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा सहकार्याची आवश्यकता असते. रोजा सोडण्याची जेव्हा वेळ असेल तेव्हा घरातच रोजा सोडा,” असं शरद पवार यावेळी म्हणाले.

आणखी वाचा- राज्यात बंद झालेल्या जत्रा, पैलवानांबद्दल शरद पवार म्हणाले…

घराबाहेर पडू नका
“केंद्राच्या सुचना पाळण्याची खबरदारी आपण घेतली तर करोनावर आपण मात करू शकू. तीन आठवड्यानंतर अधिक सुधारणांसाठी हा कालावधी नाईलाजानं ३ आठवड्यांसाठी वाढवावा लागला. ३ मेपर्यंत अजून १२ दिवसांचा कालावधी आहे. या काळात आपण काळजी घेतली तर ३ मे नंतर परिस्थितीत बदल होईल. नियमावलीत शिथिलता आणण्याचा निर्णय कदाचित घेतला जाईल याबाबत मनात शंका नाही,” असं मत त्यांनी व्यक्त केलं. काळजी घ्या अजिबात बाहेर पडू नका असंही त्यांनी नमूद केलं.

आणखी वाचा- पालघर घटनेवर शरद पवारांचं मोठं वक्तव्य

करोनाशी लढणाऱ्यांबाबत आत्मियता हवी
“लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत आहे. देशातला आणि राज्यातला आकडा चिंताजनक आहे. जे लोक करोनाशी सामना करण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्यासाठी लढत आहे त्यांच्यासाठी आत्मियता दाखवणं आवश्यक आहे. त्यांच्या कुटुंबीयांसोबत आपण आहोत हे आपण त्यांना पटवून दिलं पाहिजे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

आणखी वाचा- मुंबई, पुण्यात नियमांची कठोर अंमलबजावणी करा : शरद पवार

नवाब मलिकांचंही आवाहन
कोणत्याही परिस्थितीत मशिदीत, घराच्या, इमारतींच्या छतावर, मोकळ्या मैदानात एकत्र येऊन नमाज पठण किंवा इफ्तार करण्यात येऊ नये. कोणत्याही सामाजिक, धार्मिक किंवा कौटुंबिक कार्यक्रम एकत्र येऊन साजरा करण्यासही मज्जाव करण्यात आल्याचं मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं होतं. तसंच सर्व मुस्लिम बांधवांनी त्यांच्या घरातच नियमित नमाज पठण, तरावीह आणि इफ्तारचं धार्मिक कार्य पार पाडावं, लॉकडाउन संदर्भात पुढील आदेश येईपर्यंत सुचनांचं पालन करावं, अशी मार्गदर्शक तत्वंही त्यांनी जाहीर केली होती.