देशाच्या इतिहासाला सुरुंग लावण्याचं काम सुरु असून ज्यावेळी राज्यकर्ते अशा दिशेने जातात तेव्हा चिंतेची बाब असते अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विदर्भात शक्तीप्रदर्शन करण्यात आल. यावेळी शरद पवार यांच्यासहित एकनाथ खडसे, जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल, अमोल मिटकरी हेदेखील मंचावर उपस्थित होते.

“कार्यकर्त्यांच्या मनात असलेली अस्वस्थता दूर करण्यासाठी दोन दिवसांचं शिबीर चिंतन घेण्याची गरज आहे. राज्य आपल्या हातात राहिलं नाही त्यामुळे अस्वस्थता असलेला मोठा वर्ग आपल्यात आहे. देशाची सत्ता हातात असल्याने त्या सत्तेचा वापर करुन महारष्ट्रातील राज्य संकटात कसं आणता येईल यासाठी प्रयत्न सुरु आहे. चौकशा केल्या जातात, तुरुंगात टाकलं जातंय, खटले दाखल होत आहेत. काही ना काही करुन शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला कसा त्रास देता येईल याचा एककलमी कार्यक्रम सुरु आहे. आपण सामूहिक शक्ती एकत्र उभी केली तर हे प्रयत्न हाणून पाडू शकतो,” असा विश्वास यावेळी शरद पवारांनी व्यक्त केला.

“एसटी कामगार हा समाजातील लहान घटक आहे. गेली ४०-५० वर्षांपासून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने प्रयत्न केले. कामगारांना दोष देता येणार नाही. नेतृत्व चुकीचं असलं की चुका होतात. एसटी कामगारांच्या बाबातीत काय घडलं हे लोकांनी टीव्हीवर पाहिलं, वर्तमानपत्रात वाचलं. त्यातून सर्वसामान्य एसटी कामगाराला चुकीच्या रस्त्याने नेण्याचं काम काही लोकांनी केल्याचं दिसत आहे,” असं शरद पवार म्हणाले.

“सार्वजनिक जीवनात संकटं येतात. काही आयोजित केलेली असतात तर काही परिस्थितीने आणलेली असतात. पण त्यांना तोंड देण्याची भूमिका घ्यायची असते,” असं सांगताना शरद पवारांना मुंबईतील दंगली आणि लातूरच्या भूकंपाचा किस्सा सांगितला. संकटं येतात पण त्यावर मात कऱण्याची हिंमत लागते असं शरद पवार म्हणाले. कालचं काही संकट नव्हतं, कोणीतरी चिथावणी दिली म्हणून ती घटना घडली असंही ते म्हणाले.

“एक वेगळं जातीय वातावरण देशात निर्माण केलं जात आहे. हिंदू-मुस्लिम दंगल, दलितांमध्ये काही करता येईल का यासाठी सतत काहीतरी सुरु आहे. काश्मीरमध्ये हिंदू समाज एकेकाळी राहत होता. एक काळ आला तेव्हा दहशतवाद्यांनी हिंदूंवर हल्ला केला आणि त्यांना काश्मीर सोडून यावं लागलं. यावर एका गृहस्थांनी सिनेमा काढला आणि हिंदूंवर अत्याचार कसा केला असं दाखवलं. ज्यावेळी एखादा लहान समाज संकटात जातो आणि तिथला मोठा समाज असणारा मुस्लिम त्यांच्यावर हल्ला करत होता हे दिसतं तेव्हा देशातील बहुसंख्य असणाऱ्या हिंदू समाजात एक प्रकारची अस्वस्थता निर्माण होते. ही अस्वस्था निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. ज्या लोकांच्या हातात देशाची सत्ता आहे त्यांनीच हा सिनेमा पाहिला पाहिजे अशी घोषणा करणं दुर्दैवी आहे,” अशी खंत शरद पवारांनी व्यक्त केली.

“त्यावेळी काँग्रेस सत्तेत नव्हतं, राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मही झाला नव्हता. त्या हल्ल्याची जबाबदारी भाजपाला टाळता येत नाही. हे देशाच्या इतिहासाला सुरुंग लावण्याचं काम आहे. ज्यावेळी राज्यकर्ते अशा दिशेने जाता तेव्हा चिंतेची बाब असते,” असा आरोप शरद पवारांनी केला.

“महाराष्ट्रात तीन पक्षांचं सरकार आहे. केंद्राचं सहकार्य नसतानाही आपण पुढे जात आहोत. आज देशासमोर महागाईचा मोठा प्रश्न आहे. पेट्रोल, डिझेलच्या किंमती रोज वाढत आहेत. यामुळे सगळ्या गोष्टींची किंमत वाढते आणि सर्वसामान्यााला याचा फटका बसतो. तरुणांना पदवी मिळवूनही रोजगार मिळत नाही म्हणून वणवण फिरत आहे. तरुणांचा विचार करण्यासाटी संबंधित देशाची सत्ता वापरण्याची गरज असताना मोदी सरकार त्याकडे ढुंकून पाहत नाही,” असं शरद पवारांनी सांगितलं.