राष्ट्रवादी काँग्रेसेचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आज सांगली येथे पत्रकारपरिषदेत बोलताना, सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकीय वादंगाच्या पार्श्वभूमीवर भाजपावर आणि अप्रत्यक्षपणे मनसेवर निशाणा साधल्याचे दिसून आले.

जयंत पाटील म्हणाले, “देशात मोदी सरकारचं अपयश हे महागाईमुळे प्रकर्षाने जाणवायला लागलं आहे. मध्यमवर्गीय आणि गरीब माणसं या महागाईत होरपळायला लागली आहेत. संसार करसा करायचा असा प्रश्न या महागाईमुळे या देशातील कोट्यावधी जनतेसमोर आहे. पण मार्क्सने म्हटलेलं आहे की, धर्म ही अफूची गोळी आहे आणि ती अफूची गोळी देण्याचं काम सध्या भाजपा या देशातील लोकांचं लक्ष महागाईवरून विचलीत करण्यासाठी वापरायला लागलेली आहे आणि त्यासाठी काही बुजगावण्यांचा वापर चालू झालेला आहे.”

तसेच, “जे स्वत: करता येत नाही ते बुजगावण्याच्या मार्फत करायचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे या देशातील गरीब जनतेचा मोठा भ्रमनिरास भाजपाच्या कारभाराबद्दल झालेला आहे. कितीही वेळा लोकांचं लक्ष विचलित केलं तरी सामान्य माणसाला या महागाईमुळे उद्याचा दिवस आपण कसा काढायचा याची चिंता असते. त्यामुळे या देशातील लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे, ती दडवण्याचा प्रयत्न सध्या वेगवेगळे राजकीय भोंगे वाजवून करण्याचं काम सुरू आहे.” असंही यावेळी जयंत पाटील यांनी बोलून दाखवलं.