राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करोना काळात जीव धोक्यात घालत जोखीम पत्करुन काम करणाऱ्या करोना योद्ध्यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेदेखील यावेळी उपस्थित होत्या. रुग्णवाहिका चालक, सफाई कर्मचारी, पोलीस, डॉक्टर यांना यावेळी राखी बांधण्यात आली. यावेळी महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, शहर अध्यक्ष नगरसेवक प्रशांत जगताप यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी गेल्या दीड वर्षात कोविड योद्ध्यांनी केलेल्या कामाचं कौतुक केलं. लॉकडाउनमध्ये आम्ही घरी थांबलो असताना कोविड योद्धे बाहेर मैदानात होते. आपली काळजी न करता कोविड योद्ध्यांना सातत्याने काम केलं सांगत सुप्रिया सुळे यांनी आभार मानले. फूल ना फुलाची पाकळी म्हणून हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचं यावेळी त्यांनी म्हटलं.

“आपण सगळे माणुसकी विसरलो आहोत असं मला वाटत होतं. पण गेल्या दीड वर्षात मला माणुसकीचं दर्शन झालं. करोनाने नात्यांचं महत्व शिकवलं,” अशा भावना सुप्रिया सुळे यांनी यावेळी व्यक्त केलं. सुप्रिया सुळेंनी यावेळी पोलिसांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडीओचा दाखला देत लोकांनी करोना काळात दिलेल्या कारणांबद्दल सांगितलं. तसंच त्यांचं सोशल मीडिया अकाऊंट फॉलो करा असं आवाहन केलं.

करोना रुग्ण अद्यापही आढळत असून अनेक राजकीय पक्षांचे मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम होत आहे. त्यावेळी कोणत्याही नियमांचे पालन केले जात नाही. त्यावर प्रसारमाध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि बाळासाहेब थोरात हे सातत्याने करोनाचे नियम पाळा जेणेकरुन तिसरी लाट येणार नाही यासाठी काळजी घेण्यास सांगत आहेत. आपण सर्वांनी त्याचं पालन केलं पाहिजे”.

भाजपाकडून राज्यात जन आशिर्वाद यात्रा काढण्यात आली आहे. त्यावेळी गर्दी दिसत आहे. त्यावर त्या म्हणाल्या की, “याबाबत मुख्यमंत्री आणि संजय राऊत सविस्तर बोलले आहेत. त्यामुळे केंद्रातील मंत्र्यांनी जबाबदारीने वागून चांगला आदर्श समोर ठेवण्याची गरज आहे. तसंच करोना काळात राजकीय मतभेद बाजूला ठेवून कोविडविरोधातील युद्धात गर्दीची ठिकाणं आपण सर्वांनी टाळली पाहिजेत. आपणच नियम बनवतो आणि आपणच पाळली नाहीत तर ते फारसं योग्य होणार नाही”.

राज ठाकरेंच्या टीकेला उत्तर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या की, “आमचं दडपशाहीचं सरकार नाही. त्यामुळे कोणीही काही बोलावं त्याबद्दल काही हरकत नाही. ते बोलले म्हणजे काही सत्य होत नाही”.

राज ठाकरे याच विधान लक्षात घेता भविष्यात मनसे आणि भाजपा युती करणार अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यावर त्या म्हणाल्या की, “कोणी युती करावी किंवा आघाडी करावी हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. जर त्यांनी केलीच तर माझ्या त्यांना शुभेच्छा असतील”.

निलेश लंके यांच्यावरील आरोपांवर प्रतिक्रिया

पारनेरच्या तहसीलदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके यांच्यावर आरोप केले आहेत. त्या प्रश्नावर त्या म्हणल्या की, “मी माहिती काढलेली असून मी स्वतः त्यांच्या संपर्कात आहे. ज्यावेळी कोणत्याही महिलेचा विषय येतो तेव्हा आपण सर्वांनी संवेदनशीलपणे विचार केला पाहिजे. एखादी क्लिप आली म्हणजे समज-गैरसमज होतात. त्यात त्या महिलेची गोपनीयता जपली पाहिजे. आम्ही त्यात स्वतः जातीने लक्ष घालत आहोत, त्यामुळे कोणीही अफवांवर विश्वासू ठेवू नये, एवढच मी सांगू शकते”.