ठाकरे सरकारमधील नेत्यांविरोधात सुरु असलेल्या ईडीच्या कारवायांमुळे सध्या आरोप-प्रत्यारोपाच्या मालिका सुरु आहेत. सूडबुद्धीने ही कारवाई केली जात असल्याचा आरोप ठाकरे सरकारच्या नेत्यांकडून केला जात आहे. अनिल देशमुख, अनिल परब, एकनाथ खडसे, प्रताप सरनाईक, आनंद अडसूळ अशा अनेक नेत्यांवर ईडीकडून कारवाई केली जात आहे. या सर्व घडामोडींदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवारांचा एक व्हिडीओ ट्वीट केला असून अप्रत्यक्षपणे ईडीच्या कारवायांवरुन निशाणा साधत इशाराच दिला आहे. "सुडाच्या राजकारणाला मात देणारा, महाराष्ट्रातील घडामोडींना निर्णायक वळण देणारा, दिल्लीच्या तख्त़ासमोर महाराष्ट्र झुकत नाही, या इतिहासाची पुनरावृत्ती करणारा हाच तो दिवस," असं राष्ट्रवादीने ट्वीट करताना म्हटलं आहे. शुक्रवारी मी स्वतःच ईडी कार्यालयात जाऊन ‘पाहुणचार’ स्वीकारणार : शरद पवार या व्हिडीओत शरद पवारांनी ईडीने समन्स बजावल्यानंतर घेतलेली पत्रकार परिषद आणि त्यात केलेली महत्त्वाची वक्तव्यं घेण्यात आली आहेत. तसंच दोन वर्षांपूर्वी आजचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात ठरला टर्निंग पॉईंट, साहेबांनी सुडाच्या राजकारणाला दिली धोबीपछाड असंही सांगण्यात आलं. शरद पवारांनी यावेळी पत्रकार परिषदेत काय म्हटलं होतं - "ईडीने माझ्यासंदर्भात शिखर बँक प्रकरणात जो गुन्हा दाखल केला आहे. त्या गुन्ह्याच्या संदर्भात मी माझी स्वतःची भूमिका अशी आहे की मी ईडीला पूर्णपणे सहकार्य करणार. नक्की गुन्हा काय केला ते मला समजून घेतलं पाहिजे," असं शरद पवार यांनी म्हटलं होतं. "शुक्रवार दिनांक २७ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता ईडीच्या ऑफिसमध्ये मी स्वतः जाणार आहे. तिथे जाऊन ईडीचा ‘पाहुणचार’ स्वीकारणार आहे," असाही टोला शरद पवार यांनी लगावला होता. "या राज्यात शिवछत्रपतींचे संस्कार भिनले आहेत. दिल्लीच्या तख्तासमोर झुकण्याचा संस्कार या महाराष्ट्राला शिकवलेला नाही," असंही शरद पवारांनी यावेळी सांगितलं होतं. https://twitter.com/ANI/status/1176793742411325440?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1176793742411325440%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fmumbai%2Fi-will-myself-go-to-enforcement-directorate-on-27-september-to-give-all-information-what-i-have-with-me-about-this-case-scj-81-1979208%2F काय झालं होतं - महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी ईडीने शरद पवार, अजित पवार यांच्यासह एकूण ७० जणांवर गुन्हा दाखल केला होता. यासंदर्भातच शरद पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका मांडली होती. ईडीच्या मुंबईतील कार्यालयात स्वत:च उपस्थित राहणार असल्याचं शरद पवार यांनी जाहीर केलं होतं. त्यानंतर खबरदारी म्हणून मुंबई पोलिसांकंडून कुलाबा, कफ परेड, मरीन ड्राइव्ह, आझाद मैदान, डोंगरी, जे. जे. मार्ग, एमआरए मार्ग या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जमावबंदीचे आदेश दिले होते. याव्यतिरिक्त अनेक ठिकाणी नाकाबंदीही करण्यात आली होती. नंतर दुपारी पावणे दोनच्या सुमारास खुद्द शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत आपण तूर्तास ईडीच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय स्थगित केल्याची माहिती दिली होती. तूर्तास कोणत्याही चौकशीची सध्या गरज नसून आवश्यकता असल्यास चौकशीसाठी बोलवण्यात येईल, असा ईमेल ईडीकडून शरद पवार यांना पाठवण्यात आला होता. तसंच त्यांनी ईडीच्या कार्यालयात जाऊ नये यासाठी मनधारणी करण्यासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त आणि पोलीस आयुक्तांनी त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर काही वेळाने शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आपण तूर्तास ईडीच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय तहकूब केला असल्याची माहिती दिली होती.