पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात नवजात जुळ्या बालकांचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची हदयद्रावक घटना घडली आहे. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे या बाळांनी आपल्या आईसमोरच जीव सोडला. रुग्णालयात जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे या मुलांना वेळेत उपचार मिळाले नाहीत आणि त्यामुळे यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर पालघरमधील मूलभूत सुविधांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

उपचाराअभावी रस्त्यातच बालकांचा मृत्यू

पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात वंदना भुदर नावाच्या महिलेने सातव्या महिन्यातच जुळ्या बाळांना जन्म दिला होता. बाळांतपणात वंदना यांना मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. वेळेच्या अगोदरच बाळांचा जन्म झाल्यामुळे दोनही मुले खूप अशक्त होती. त्यामुळे उपचारासाठी त्यांना रुग्णालायत दाखल करणे गरजेचे होते. मात्र, रुग्णालयात जाण्यासाठी चांगला रस्ता नव्हता. अखेर वंदनाच्या कुटुंबीयांनी झोळीच्या सहाय्याने वंदना आणि तिच्या नवजात जुळ्यांना खडकाळ भागातून वाट काढत जावे लागले.

हेही वाचा- उल्हासनगरः घरकामगार महिलेची ‘हातसफाई’ ; घरातून १३ लाखांची रोकड केली लंपास, गुन्हा दाखल

चित्रा वाघ यांचे ट्वीट

भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी या घटनेबाबत ट्वीट केले आहे. पालघर जिल्हा मोखाड्यातील अतिदुर्गम बोटोशी गावातील मरकटवाडी येथे घडलेली ही घटना अत्यंत वेदनादायी आहे. पालघरसोबत रत्नागिरी, गुहाघर, धनगरवाडी सारख्या आदिवासी गावांमध्ये जनतेला अशा प्रश्नांना जनतेला सामोरं जावं लागतयं आपण या प्रश्नांकडे लक्ष देतं या समस्या प्राधान्याने सोडवाल ही अपेक्षा आहे, असं चित्रा वाघ यांनी ट्वीटमध्ये म्हणलं आहे.

हेही वाचा-

तीन किलोमीटर पायपीट करुन आई रुग्णालयात दाखल

मात्र, वेळेत उपचार न मिळाल्यामुळे वंदनाच्या दोनही नवजात जुळ्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला. खडकाळ भागातून प्रवास करावा लागल्यामुळे वंदनाला आणखी रक्तस्त्राव झाला होता. अखेर तीन किलोमीटर पायपीट केल्यानंतर वंदनाला रुग्णालयात दाखल करण्यात आले.