लोकसभा निवडणुकीला आता अवघं एक वर्ष बाकी आहे. परंतु यासाठी देशभरातील वेगवेगळ्या पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तर युत्या, आघाड्या आणि मित्रपक्षांमध्ये वाटाघाटी सुरू झाल्या आहेत. दरम्यान, मंगळवारी मुंबईत महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत तिन्ही पक्षांचा लोकसभा निवडणुकीच्या जागांचा निर्णय झाल्याची बातमी पसरू लागली आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या एकूण ४८ जागांपैकी २१ जागा शिवसेनेच्या ठाकरे गटाला, १९ जागा राष्ट्रवादी काँग्रेस आणि केवळ ८ जागा काँग्रेस लढवणार असल्याच्या बातम्या व्हायरल होऊ लागल्या आहेत. दरम्यान, ही बातमी फेक असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज स्पष्ट केलं. नाना पटोले म्हणाले की, "लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासंदर्भात कोणतीही बैठक झालेली नाही. जागवाटपासंदर्भातली ती बातमी फेक आहे. राज्याच्या सर्व सहा विभागांमध्ये महाविकास आघाडीच्या सभा होणार आहेत. त्यासंदर्भात बैठक झाली आहे." हे ही वाचा >> बाळासाहेबांचा राजकीय वारसदार कोण, राज ठाकरे की एकनाथ शिंदे? संजय राऊत म्हणाले… भाजपाला सत्तेतून बाहेर जावं लागेल : पटोले दरम्यान, या बातम्या सत्ताधाऱ्यांकडून पसरवल्या जात आहेत का? असा सवाल टीव्ही ९ मराठीने विचारला असता पटोले म्हणाले की, "भाजपाने काहीही केलं तरी त्यांच्या हाती काहीच लागणार नाही. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी त्यांनी प्रयत्न केला. विधानसभेच्या पोटनिवडणुकीतही तसा प्रयत्न केला पण त्यांच्या हाती काहीच लागलं नाही. कोणत्याही प्रकारचं वातावरण पसरवलं तरी भाजपाला राज्याच्या सत्तेतून बाहेर जावं लागेल."