विश्वास पवार, लोकसत्ता वाई : पावसाळय़ातील रानफुलांच्या बहराने सर्वत्र परिचित झालेल्या कास पठारावर शासनाच्या वन विभागाने ‘रात्र पर्यटन सफारी’ची नवी टूम काढली आहे. वास्तविक या रानफुलांच्या बहराचे विशिष्ट दोन महिने वगळता कासचे पठार म्हणजे केवळ एक शुष्क माळ असतो, शिवाय या माळाभोवतीही फिरायचे म्हटले तरी केवळ विरळ झाडी आणि अपवादात्मक दिसणारे वन्यजीव, अशी स्थिती असताना या संवेदनशील ठिकाणी पुन्हा पर्यटनाचा बाजार का मांडला जात आहे. कायमस्वरूपी थाटू पाहणाऱ्या या बाजारातून रानफुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या या स्थळाच्या मूळ वैशिष्टय़ालाच धोका निर्माण होण्याची भीती निसर्गप्रेमींकडून व्यक्त होत आहे. पावसाळय़ात उमलणाऱ्या हजारो रानफुलांच्या बहराने कासला स्वतंत्र ओळख बहाल केली. या वैशिष्टय़ाची दखल घेत ‘युनेस्को’ने देखील या स्थळाला जागतिक वारसा स्थळाच्या यादीत स्थान दिले. फुलांचे आकर्षण आणि जागतिक वारसा स्थळाचा मिळालेला दर्जा यामुळे दरवर्षी पावसाळय़ात हजारो पर्यटक कासला भेट देतात. कासच्या प्रसिद्धी आणि प्रचाराचा वापर करत वन विभागाच्या वतीने आता या परिसरात ‘रात्र पर्यटन सफारी’ची कल्पना पुढे आणली आहे. वन विभागाच्या दोन जीपच्या माध्यमातून ही सफारी होणार आहे. आठ जणांच्या तीन तासांच्या या फेरीसाठी चार हजार रुपयांची आकारणी केली जाणार आहे. कासचा नैसर्गिक अधिवास हा निराळय़ा प्रकारचा आहे. त्यामुळे इथे वर्षभर पर्यटनाचा आग्रह अत्यंत चुकीचा असून यातून कासच्या निसर्ग-पर्यावरणाचे नुकसान होईल असे मत निसर्ग अभ्यासकांमधून व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रस्तावित ‘रात्र सफारी’तील नेमके पर्यटन काय याबाबत ठोस उत्तर देण्यात वन विभागही असमर्थ ठरला आहे. या पर्यटनातून आम्हाला या भागात गस्त घालता येऊन त्याद्वारे शिकार रोखता येईल असे भलतेच उत्तर त्यांच्याकडून प्राधान्याने दिले जात आहे. ही ‘रात्र सफारी’ केवळ कास परिसरातील रस्त्यावरून होणार आहे. या वेळी जे प्राणी दिसतील तेवढेच पाहता येतील. या पर्यटनामागे मुख्यत्वे जंगलातील गस्त वाढवणे, शिकार रोखणे हाच उद्देश आहे. - महादेव मोहिते , उपवनसंरक्षक, सातारा जंगलात ‘रात्र सफारी’ करणे हेच मुळात बेकायदा आहे. याला वन कायद्यामध्ये सुद्धा आधार नाही. हा वन्यजीवांच्या अधिवासात प्रत्यक्ष हस्तक्षेप आहे. वन विभागाकडून दुर्लक्ष होणारी ही बाब गंभीर आहे. या हस्तक्षेपातून वन्यजीव स्थलांतरित होत भविष्यात त्यांच्याकडून मानवी हल्ले वाढण्याचीही भीती आहे. या उपक्रमाला वेळीच रोखले पाहिजे. - सुनील भोईटे, वन्यजीव अभ्यासक, सातारा