राहाता : राज्यातील महाआघाडी सरकारने बिलाअभावी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडले, याविषयी आपण प्रश्न उपस्थित केल्यानंतर वीज तोडली जाणार नाही, असा निर्णय सरकारला घ्यावा लागला. आघाडी सरकार फक्त घोषणा करते, इथेही अनेक जण निळवंडेच्या गप्पा मारतात, मग ३० वर्षांपूर्वी कोठे होते? असा सवाल माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे यांनी केला. शिर्डी मतदारसंघातील केलवड, खडेवाके, पिपरी लोकाई, नांदुर्खी, दहेगांव, वाळकी कोऱ्हाळे, कोऱ्हाळे आडगाव येथील राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या लाभार्थीना विविध साहित्य वितरण कार्यक्रमात आमदार विखे बोलत होते. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे, उत्तर प्रदेश येथील डॉ. एन सिंग, डॉ. आर. के. श्रीवास्तव, सुभाष गमे, पी.डी. गमे, काळू रजपुत, गणीभाई शेख, सचिन मुरादे सतीश बावके, बाळसाहेब डांगे, उत्तमराव डांगे, संतोष ब्राह्मणे, सुनील गमे, नामदेव घोरपडे, नकुल वाघे, पूनम बर्डे, संगीता कांदळकर, बाळासाहेब थोरात आदी उपस्थित होते. यावेळी आ. विखे म्हणाले की, शिर्डी मतदारसंघात विविध योजनेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला आधार देण्याचे काम सुरू आहे. राज्यातील महाआघाडी सरकारने सर्वाना वाऱ्यावर सोडले. वीज तोडणी करून शेतकऱ्यांना वेठीस धरले. पण आपण विधानसभेत प्रश्न उपस्थित करून वीज तोडणी थांबविली. कोविड काळात जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आपले योगदान काय? दुधाचा प्रश्न आणि दूध दरवाढीचे आश्वासन दिले पण पूर्तता मात्र अजूनही नाही. निवडणुकीपुरते जनतेसमोर येणारेही जनतेत नाहीत. केंद्र सरकारवर टीका करतांना आपण काय केले हे जनतेला सांगा, असे आव्हान देत आ. विखे यांनी पंतप्रधान मोदींनी सुरू केलेले काम जनतेला मोठा आधार देत आहे. वयोश्री योजना ही तर ज्येष्ठांसाठी आनंददायी योजना ठरत असल्याचे सांगितले. खासदार डॉ. सुजय विखे यांनी जिल्ह्यातील ४१ हजार लोकांना याचा लाभ दिला, पण येथील खासदार मात्र कुठे दिसत नाहीत, अशी खोचक टीकाही केली. यावेळी खा.विखे यांनी सर्वाना बरोबर घेत समाजिक दायित्वाचा वारसा आपण जपत आहोत. पण विखे पाटील यांचे नाव घेतल्याशिवाय काहींना चैन पडत नाही. परंतु आपण याकडे दुर्लक्ष करतो. आपण सर्वाना पुरून उरतो. त्यामुळे आपण आपली चिंता करा. आमची चिंता करू नका, असा सल्ला देत असतानाच या योजनेतून पंतप्रधान मोदींनी ज्येष्ठांचे जीवन सुकर केले आहे. यावेळी केलवड येथील एक कोटी १३ लाखांच्या विविध विकासकामांचे लोकर्पण आणि भूमिपूजन करण्यात आले.