विरारमधील धानिव बाग राशीत कंपाऊंड या परिसरात ९ वर्षाच्या चिमुकल्याला विजेच्या तारेचा शॉक लागल्याने मृत्यू झाला आहे. या संदर्भात पेल्हार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या मुलाच्या कुटुंबीयांनी महावितरणवर गलाथान कारभाराचा आरोप केला आहे. घरावरून उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या नेल्या असतानाही त्याबाबत सुरक्षेची काळजी घेण्यात आलेली नाही, असं मत त्यांनी व्यक्त केलंय.

नालासोपारा पूर्वेकडील धानिव बाग राशीत कंपाऊंडमध्ये श्री सदगुरू वेल्फेअर सोसायटी राहणारा प्रत्यक्ष यादव (९) हा घरावरील छपरावर चेंडू काढण्यासाठी चढला. मात्र, घरावर अती उच्च दाबाच्या विद्युत वाहिनी होत्या. प्रत्यक्षचा विद्युत प्रवाह सुरु असलेल्या या वाहिनेला स्पर्श झाल्यामुळे तो पूर्णपणे भाजला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात जात असतानाच गुरुवारी (१६ डिसेंबर) मृत्यू झाला.

“वसाहतीतील नागरिकांच्या डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार”

प्रत्यक्षचे वडील सुरेंद्र यादव हे रिक्षाचालक असून त्यांना २ मुली आणि एक मुलगा होता. मुलाच्या मृत्यूमुळे यादव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हेही वाचा : “कोणालाही वीज फुकटात मिळणार नाही”, शेतकऱ्यांना वीज बिलाला मुदतवाढ देण्यावर नितीन राऊतांचं वक्तव्य

महावितरणच्या गलथान कारभारामुळे आमच्या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ही चाळ या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीखाली असल्याने नागरिकांच्या डोक्यावर टांगती तलवार लटकत आहे.