राज्य सरकारतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा रायगडावर शुक्रवारी ( २ जून ) पार पडला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज्य सरकारवर टीकास्र डागलं आहे. “छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेलं राज्य हे सनातनी नव्हतं. ते रयतेच स्वराज्य होतं. तुम्ही परत परत चुक करताय. तुमचा टकमकी वरून लवकरच जनता कडेलोट करेल,” असा इशारा अमोल मिटकरी यांनी राज्य सरकारला दिला.
नेमकं काय म्हणाले अमोल मिटकरी?
ट्वीट करत मिटकरींनी सांगितलं की, “छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथीनुसार राज्याभिषेक सोहळा सनातन धर्म प्रचारासाठी होता का? छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेलं राज्य हे सनातनी नव्हतं. ते रयतेच स्वराज्य होतं! तुम्ही परत परत चुक करताय. तुमचा टकमकी वरून लवकरच जनता कडेलोट करेल.”




“तुम्ही रायगडाच्या पवित्र भूमीत सनातनी सत्तेचा…”
“ज्या सनातनी प्रवृत्तीने शिवरायांचा राज्याभिषेक नाकारला, त्यांनाच डोक्यावर घेऊन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी सत्तेचा गैरवापर करुन तिथीनुसार हा कार्यक्रम राबवला. महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता याचं चोख उत्तर देईल. तुम्ही रायगडाच्या पवित्र भूमीत सनातनी सत्तेचा उन्माद केलाय,” अशी टीका अमोल मिटकरी यांनी शिंदे सरकारवर केली आहे. याला भाजपा आमदार नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा : “गौतम अदाणी शरद पवारांच्या घरी राहायला गेले, तरी…”, नाना पटोलेंचं विधान
“…मग पुढचा चेक माझ्या नावाने देतो”
“अमोल मिटकरी हे फार लहान आहेत. कारण, ते चेकशिवाय बोलत नाहीत. मला याचा अनुभव आहे. अमोल मिटकरी यांच्यात हिंमत असेल, तर उद्धव ठाकरेंना जाऊन सांगाव की, एकच शिवजयंती साजरी करावी. मग पुढचा चेक माझ्या नावाने देतो. माझा चेक क्लीअर होतो, बाउन्स होत नाही,” असा टोलाही नितेश राणेंनी लगावला आहे.