Mumbai Blast Terrorist Yakub Memon Grave Renovation : मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील दोषी याकुब मेमनच्या कबरीला सुशोभित करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. दक्षिण मुंबईतील मरिन लाईन्स परिसरातील बडा कब्रिस्तानमध्ये मेमनची कबर आहे. या कबरीला मार्बल्स आणि एलईडी लाईट्स लावण्यात आले होते आणि फुलांच्या पाकळ्यांनी ही कबर सजवण्यात आल्याचे दिसून आले आहे. यामुळे आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपा नेत्यांकडून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. तर, शिवसेनेकडून देखील भाजपाच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपा आमदार नितेश राणे यांनी देखील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

Yakub Memon: ‘उद्धव ठाकरेंनी माफी मागावी’ म्हणणाऱ्या भाजपाला आदित्य ठाकरेंचा प्रश्न, “लादेनला समुद्रात दफन केलं, तसं याकूब मेमनला…”

“दोन वर्षे मुख्यमंत्री असताना बाळासाहेबांचे स्मारक बांधण्याचे सोडून, याकूब मेमनची कबर सजवत बसले आणि आता म्हणे माझ्या बापाच्या नावाने मतं मागू नका!” असं ट्वीट करत आमदार नितेश राणे यांनी याकुब मेमनच्या कबरीच्या मुद्य्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

… मग याकुबचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात का दिला?; उगाच शेपट्या आपटत बसू नका – अरविंद सावंत

हे उद्धव ठाकरेंच्या आशीर्वादाने घडतंय की मुंबई प्रेमातून? – राम कदम

याशिवाय, भाजपा नेते राम कदम यांनी याकुब मेमनच्या कबरीचे फोटो ट्वीट करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. हे उद्धव ठाकरेंच्या आशीर्वादाने घडतंय की मुंबई प्रेमातून? असा खोचक सवाल कदम यांनी विचारला आहे. महाविकासआघाडी सरकारच्या काळात या कबरीचे सुशोभीकरण करण्यात आले, असा आरोप कदम यांनी केला आहे. उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यासाठी माफी मागावी, अशी मागणी देखील कदम यांनी केला आहे.

Yakub Memon Tomb : …तर ही कोणती मताची लाचारी होती? हे सर्व जनतेसमोर आलं पाहिजे – सुधीर मुनगंटीवार

“या प्रकरणावरून टीका तर होणारचं, कारण जे दहशतवादी विचारांचे आहेत. या देशात दहशतवाद निर्माण करण्याच्या दृष्टीने जे लोक काम करतात ते या देशाचे शत्रू आहेत. ते एका जातीचे, धर्माचे, समुहाचे, वयाचे शत्रू नाहीत, तर या देशाचे, भारतमातेचे शत्रू आहेत आणि भारतमातेच्या शत्रूचं जर तुम्ही स्मारक कराल. ज्यामध्ये न्यायमूर्तींनी या दहशतवादी विचाराला कायद्याच्या चौकटीत संपवण्याचा आदेश दिला, की हा विचार देशासाठी धोकादायक आहे. त्या विचाराचं उदात्तीकरण तुम्ही कसं करू शकता?” अशा शब्दांमध्ये भाजपाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील टीका केलेली आहे.

याकुबला नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्यात आली होती –

१९९३ साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात आर्थिक सहभाग आढळल्यानंतर याकुब मेमनला न्यायालयाने दोषी ठरवले होते. क्षमायाचनेच्या याचिका फेटाळल्यानंतर याकुबला नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात ३० जुलै २०१५ रोजी फाशीची शिक्षा देण्यात आली होती. या बॉम्बस्फोट प्रकरणात याकुबचा भाऊ टायगर मुख्य संशयित आरोपी आहे. मुंबई बॉम्बस्फोटात २५७ जणांनी आपला जीव गमावला होता. जवळपास १४०० हून अधिक नागरिक या स्फोटात जखमी झाले होते.