केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरनंतर आता अमरावतीतही कृषी विद्यापीठांच्या कामकाजावर ताशेरे ओढले आहेत. “एकरी २० क्विंटल सोयाबीन झालं पाहिजे यासाठी मी प्रयत्न करून शेवटी हरलो. मला एकरी ५किंटलपेक्षा जास्त सोयाबीनचं उत्पादन घेता आलं नाही,” असं मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. तसेच “हे उत्पादन कसं वाढवायचं हे आम्हाला सांगा, अन्यथा सहावं-सातवं वेतन देऊन काय करायचं? बाप दाखव, नाहीतर श्राद्ध करा,” असंही नमूद केलं. ते अमरावतीत अपेडा आणि अॅग्रोव्हिजन फाऊंडेशनने आयोजित केलेल्या मार्गदर्शन शिबिरात बोलत होते.

नितीन गडकरी म्हणाले, “एकरी २० क्विंटल सोयाबीन झालं पाहिजे. मी प्रयत्न करून हरलो, मला ५ क्विंटलच्या वर जाता आलं नाही. एकरी २० क्विंटल कापूस झाला पाहिजे. हे करणार असेल तर तुमचा उपयोग आहे, नाहीतर सहावं-सातवं वेतन देऊन आम्ही काय करायचं? ‘बाप दाखवा, नाहीतर श्राद्ध करा’. हे उत्पादन कसं वाढवायचं हे आम्हाला सांगा.”

नितीन गडकरी सोमवारी (१८ जुलै) अमरावती दौऱ्यावर आहेत. याच दरम्यान त्यांनी अपेडा आणि अॅग्रोव्हिजन फाउंडेशनने आयोजित केलेल्या कृषी उत्पादने, फळे आणि भाजीपाला निर्यातीची संधी या विषयावर मार्गदर्शन शिबिराला हजेरी लावली. यावेळी गडकरी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी ऑरगॅनिक आणि जैविक शेतीकडे वळणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.

याशिवाय विदर्भातील शेतकऱ्यांनी फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करणे गरजेचे आहे. यातून एकमेकांना साहाय्य करणे गरजेचे आहे. असं केलं तरच यशस्वी शेतकरी बनू शकता असा सल्ला गडकरींना दिला. यावेळी नितीन गडकरींनी एकरी १०२ टन ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचं देखील कौतुक केलं. शेती करताना उत्पादन खर्च कमी करणे, उत्तम पॅकेजिंग करणे देखील महत्त्वाचे आहे. त्यामुळे निसर्गाच्या बदलत्या चक्रात मार्गदर्शन घेऊनच शेती करणे उत्तम ठरू शकते, असं त्यांनी नमूद केलं.

शेतीमध्ये विविध प्रकारचे प्रयोग करणे गरजेचे आहे. यातून चांगलं उत्पादन देखील होऊ शकतं. त्यामुळे विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाही. मराठवाड्यासारखी फळे, भाजीपाला उत्पादन देखील विदर्भात चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. याला केवळ शेतकऱ्यांनी मार्गदर्शन आणि मेहनतीची गरज आहे, असे झाल्यास विदर्भ देखील मागास राहणार नाही आणि भारत देश शेतीत प्रथम क्रमांकावर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

“प्रथम क्रमांकावर शेती राहिली पाहिजे”

नितीन गडकरी आधुनिक शेतीवर बोलताना म्हणाले, “आता आपल्याला शेती अशी करायची आहे की प्रथम क्रमांकावर शेती राहिली पाहिजे, द्वितीय क्रमांकावर व्यवसाय आणि तिसऱ्या क्रमांकावर नोकरी आली पाहिजे. तुम्ही मनात आणलं तर वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रयोगाच्या आधारे उत्पादन वाढवणं, खर्च कमी करणं, जागतिक बाजारपेठेत जाऊन उत्पन्न वाढवता येतं.”

“द्राक्षे लंडनला जातात, मग संत्री का नाही?”

“विलास शिंदे लंडनच्या बाजारात द्राक्षे पाठवत आहेत, तर आपली संत्री का जात नाहीत? कशामुळे आपण मागे का आहोत? याला पश्चिम महाराष्ट्र जबाबदार नाही, तुम्ही जबाबदार आहात,” असं नितीन गडकरी यांनी म्हटलं.

“लग्न झाल्यावर तुम्ही काहीच केलं नाही, तर पोरं कशी होणार?”

नितीन गडकरी पुढे म्हणाले, “तुम्ही जर चांगलं उत्पादन काढलं, चांगलं पॅकिंग केलं तर उत्पन्न वाढेल. तुम्हालाच हे करायचं आहे. एकतर परमेश्वर किंवा सरकार असं व्हायला नको. देवाने दिलं, देवाने नेलं असं जमत नाही. देवाचा आशीर्वाद जरूर पाहिजे, पण देवाचा आशीर्वाद असून भागत नाही. देवाचा आशीर्वाद आहे आणि लग्न झाल्यावर तुम्ही काहीच केलं नाही, तर पोरं कशी होणार?”

हेही वाचा : सोलापूर-औरंगाबाद प्रवासाला ४ तासाचा दावा, प्रत्यक्षात ६ तास का लागतात? पत्रकारांच्या प्रश्नावर नितीन गडकरी म्हणाले…

“माझ्या वक्तव्यातून चुकीचा अर्थ काढू नका”

“तुम्हाला देखील काही पुढाकार घ्यावा लागतो. हे उदाहरण लोकांना जास्त चांगलं समजतं. त्यामुळे तुम्हीच तुमच्या या प्रयत्नातून हे यशस्वी करा. माझ्या वक्तव्यातून चुकीचा अर्थ काढू नका. तुम्ही प्रयत्न केला, तर नक्की यात यश मिळेल,” असंही नितीन गडकरी यांनी सांगितलं.