देशाच्या क्रीडाक्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठेचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराला शुक्रवारी मेजर ध्यानचंद यांचे नाव देण्यात आले आहे. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पुरुष आणि महिला संघाने केलेल्या कामगिरीमुळे राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर काँग्रेस नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. खेलरत्न पुरस्काराचं बदलेलं नाव आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या धान्यांच्या गोणींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फोटो असल्याने निशाणा साधला आहे.

“काँग्रेसनं एकच नाव बदललं, ज्याची सर मोदींना कधीच येणार नाही. बांगलादेश”, असं ट्वीट त्यांनी केलं आहे. अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्वीट करत त्यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

दुसरीकडे मॉलिटीक्स नावाच्या ट्विटर हँडलवरून एक फोटो शेअर करण्यात आला आहे. त्यात “दाने-दाने पर लिखा है देने वाले का नाम, आपके हिसाब से उचित कॅप्शन क्या होगा? बताएं” असं ट्वीट करण्यात आलं आहे. त्यावर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी फोटो रिट्वीट करत ‘प्रचारजीवी’ अशी कमेंट्स दिली आहे.

कमेंट्सनंतर दोन्ही पक्षाचे कार्यकर्त्यांमध्ये तू तू मै मै सुरु झाली आहे. कमेंट्स बॉक्समध्ये काही भाजपा कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांचे फोटो असलेल्या गोष्टी शेअर केल्या आहेत. तसेच यालाही तीच कमेंट्स द्या असं सांगितलं आहे.