‘दुनिया मेरी मुठ्ठीमें’ म्हणत हातात आलेला मोबाईल जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदारांना हवामानाच्या अंदाजासाठी वरदान ठरत असून या हवामानावर आधारित बागांचे रोगापासून संरक्षण करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे सोपे झाले आहे. रविवारपासून जिल्ह्यात पावसाळी वातावरण असून रात्री पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. मंगळवारीही पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून त्यापासून बचाव करण्यासाठी सोमवारीच औषध फवारणी करण्यात काही शेतकरी गुंतले होते.
नसíगक संकटावर मात करण्याचा प्रयत्न शेतकरी अगोदरपासून करीत आला आहे. काíतक महिन्यात होणाऱ्या तुळसी विवाहावेळी पावसाचे थेंब हमखास पडतात हा पिढीजात अंदाज आहे. या पावसाची रानातील पिकांसाठी काहीशी गरजही असते. विशेषता शाळू, करडई या पिकांना या पावसाचा लाभ होतो.
मात्र जिल्ह्यात अलीकडच्या काळात द्राक्षासारखे नगदी पीक वाढल्याने अवेळीचा पाऊस नुकसानकारक ठरू लागला आहे. दहा दिवसांपूर्वी अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे जिल्ह्यात द्राक्षपिकावर दावण्याचा प्रादुर्भाव झाला. मात्र आधुनिक शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घेऊन अगोदरच उपाययोजना केल्याने दावण्यामुळे मोठय़ा प्रमाणात होणारे नुकसान टाळता आले.
पावसाचा अंदाज घेण्यासाठी मोबाईलवर सहज उपलब्ध होणाऱ्या इंटरनेटचा वापर शेतकरी वर्गातून केला जात आहे. मोबाईलवरील इंटरनेटच्या माध्यमातून आगामी दहा दिवसातील वातावरणात होणारा बदल कळत आहे. हवामानातील आर्द्रता, हवेचा दाब, ढगाळ हवामान की स्वच्छ हवा, पावसाची शक्यता कितपत आहे ही माहिती स्थानिक पातळीवरील उपलब्ध होत असल्याने आणि तसेच हवामानात बदल होत असल्याचे लक्षात आल्याने शेतकरी हातातील मोबाईलवर जास्त विश्वास ठेवून उपाय योजत आहे.
रविवारपासून जिल्ह्यात ढगाळ आणि पावसाळी वातावरण राहील, सोमवारी यामध्ये थोडा उतार असला तरी पुन्हा मंगळवारी पावसाची शक्यता वर्तविण्यात आले आहे. २५ नोव्हेंबपर्यंत पावसाची शक्यता पुन्हा एकदा निर्माण होणार असल्याचा अंदाज इंटरनेटवर व्यक्त करण्यात आल्याने त्यादृष्टीने शेतकरी तयारीत आहेत.