India Pakistan War Tensions: भारतीय सशस्त्र दलांनी बुधवारी रात्री उशिरा पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ले केले. हे हवाई हल्ले २०१९ मध्ये बालाकोटमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यानंतर आणि २०१६ मध्ये उरी हल्ल्यानंतर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर भारताने केलेला सर्वात मोठा हवाई हल्ला होता.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने केलेल्या या हवाई हल्ल्यानंतर, पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पुण्याच्या संतोष जगदाळे यांच्या पत्नीने समाधान व्यक्त केले आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना संतोष जगदाने यांच्या पत्नी प्रगती जगदाळे म्हणाल्या की, “दहशतवाद्यांनी ज्या प्रकारे आपल्या मुलींचे कुंकू पुसले, त्याला हे एक योग्य प्रत्युत्तर आहे. या ऑपरेशनचे नाव ऐकताच माझ्या डोळ्यात पाणी आले. मी सरकारचे मनापासून आभार मानतो.”
दरम्यान ऑपरेशन सिंदूरचा भाग म्हणून भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर बॉम्ब टाकले आहेत, ज्यामुळे संपूर्ण पाकिस्तान हादरला आहे. ऑपरेशन सिंदूर हे भारतीय हवाई दल आणि लष्कराचे ऑपरेशन होते. एकीकडे, आयएएफच्या लढाऊ विमानांनी हवाई हल्ले केले, तर दुसरीकडे, लष्कराने क्षेपणास्त्रांचा वापर देखील केला. भारतीय सैन्याच्या हल्ल्यांची ताकद इतकी प्रचंड होती की पाकिस्तानी हवाई दलाला भारतीय हवाई दलाने क्षेपणास्त्रे डागल्याचे लक्षातही आले नाही.
भारतीय लष्कराने भारतातील दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणाऱ्या जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैय्यबाच्या वरिष्ठ नेतृत्वाला लक्ष्य करण्याच्या उद्देशाने हल्ल्यांसाठी संबंधित ठिकाणे निवडली होती. त्यानंतर हे दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. भारताने केलेल्या कारवाईमुळे पाकिस्तान घाबरला आहे. त्यांनी कराची आणि लाहोरचे हवाई क्षेत्र ताबडतोब बंद केले. याशिवाय लाहोर आणि सियालकोट विमानतळ पुढील ४८ तासांसाठी बंद ठेवण्यात आले आहेत.
दरम्यान वरिष्ठ भारतीय अधिकाऱ्यांनी अनेक देशांमधील त्यांच्या समकक्षांशी बोलून त्यांना भारताने उचललेल्या पावलांची माहिती दिली आहे. यामध्ये अमेरिका, ब्रिटन, सौदी अरेबिया, युएई आणि रशिया यांचा समावेश आहे.
भारतीय सैन्याच्या म्हणण्यानुसार, ६-७ मे २०२५ च्या रात्री, पाकिस्तानी सैन्याने जम्मू आणि काश्मीरच्या नियंत्रण रेषेवरील आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरील चौक्यांवर अकारण गोळीबार केला. या अंदाधुंद गोळीबारात तीन निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतीय सैन्य याला योग्य प्रत्युत्तर देत आहे.