पंढरपूर : करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वारकरी व नागरिकांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने तसेच वारकरी सांप्रदायाच्या सर्व प्रथा परंपरा अबाधित राखून माघी यात्रेबाबत जिल्हा प्रशासनाकडून निर्णय घेण्यात येईल. तथापि माघी यात्रेबाबत प्रशासनाने पूर्व तयारी म्हणून आवश्यक नियोजन करणे गरजेचे आहे. या कालावधीत करोना विषाणू ससंर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये तसेच ही वारी सुरक्षित व सुरळीत पार पाडण्यासाठी संबधित सर्व विभागाने समन्वय राखून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना प्रांताधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी दिल्या. माघी एकादशी १२ फेब्रुवारी रोजी आहे. वारकरी संप्रदायात आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री या चार वारीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. माघ महिन्यातील एकादशीला विदर्भ, कोकण यासह पर राज्यातून भाविक पंढरीस येतात. या पार्श्वभूमीवर माघ वारी पूर्व नियोजनाबाबत प्रांत कार्यालय पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसीलदार सुशील बेल्हेकर, मुख्याधिकारी अरिवद माळी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिराम उपस्थित होते. या वेळी गुरव म्हणाले, गेल्या काही दिवसांत करोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. माघ वारी ही करोनाच्या संकटकाळात पार पडत असल्याने याबाबत सर्व संबधित विभागांनी आपणास दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी योग्य नियोजन करावे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध ठेवण्याबाबत आरोग्य विभागाने नियोजन करावे. तसेच करोना चाचणी व लसीकरण केंद्राची ठिकाणे निश्चित करावीत. मुबलक औषधसाठा ठेवावा. आवश्यक ठिकाणी प्रथमोचार केंद्राची उभारणी करावी. माघी यात्रेचा कालावधीत ५ ते १५ फेब्रुवारी २२ पर्यंत असून, माघ शुद्ध एकादशी १२ फेब्रुवारी २२ रोजी आहे. या यात्रा कालावधीत श्रींचे सर्व राजोपचार सुरू राहतील. वारी कालावधीत वारकरी सांप्रदायाच्या प्रथापरंपरेने मंदिरात होणारे सर्व कार्यक्रम शासन आदेशान्वये व करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित व्यक्तींच्या उपस्थितीत पार पाडले जातील. असेही प्रांताधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गुरव यांनी सांगितले.