अहिल्यानगरः महापालिका, नगरपरिषद, नगरपंचायतींमधून आता ‘आपले सरकार सेवा केंद्र’ सुरू होणार आहेत. राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने या संदर्भातील आदेश जारी केला आहे. पालिकांमधील आपले सरकार सेवा केंद्रातून राज्य शासनाच्या विविध विभागांनी अधिसूचित केलेल्या सर्व ऑनलाइन सेवांचे ऑनलाइन अर्ज स्वीकारले जातील व त्या संबंधातील सेवा पुरवल्या जातील.
आपले सरकार सेवा केंद्र यापूर्वी ग्रामपंचायती व खासगी व्यक्तींमार्फत चालवली जात होती. अहिल्यानगर जिल्ह्यात १२४२ ग्रामपंचायती व ८४१ खासगी व्यक्तींमार्फत एकूण २०८३ केंद्र चालवले जातात. या केंद्रांमार्फत राज्य सरकारच्या विविध विभागांच्या अधिसूचित केलेल्या एकूण ७० सेवा ऑनलाइन पध्दतीने दिल्या जातात. आता या सर्व सेवा मनपा, परिषदा, पंचायतीमार्फतही दिल्या जाणार आहेत.
राज्यातील सर्व महापालिकांचे आयुक्त तथा प्रशासक, नगरपरिषद व नगरपंचायतींचे मुख्याधिकारी यांनी त्यांच्या अखत्यारीत सुरू करावयाच्या आपले सरकार सेवा केंद्राची यादी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करून जिल्ह्याच्या ‘एनआयसी’ केंद्राकडून मनपा, नगरपरिषद, नगरपंचायतीच्या नावाने आपले सरकार सेवा केंद्राचे ‘युजर आयडी’ प्राप्त करून घ्यायचे आहेत. त्याचप्रमाणे आपले सरकार पोर्टल वरून देण्यात येणाऱ्या सर्व सेवांकरता महाआयटी महामंडळाकडून ‘युजर आयडी’ प्राप्त करून घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महामंडळाकडे प्रस्ताव पाठवायचे आहेत.
महाआयटी महामंडळाने ऑनलाइन अर्जाचे शुल्क स्वीकारण्याकरता संबंधित मनपा, नगरपरिषदा, नगरपंचायतीच्या केंद्रांना तत्काळ ‘वॉलेट’ सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या केंद्रामार्फत राज्य सरकारच्या सर्वच विभागांच्या ऑनलाइन सेवांचे अर्ज स्वीकारले जातील व संबंधित दाखल्यांची संगणकीय प्रत देण्याची कार्यवाही मनपा, नगरपरिषद नगरपंचायतीमधील केंद्रातून होणार आहे.शहरातील नागरिकांना सर्वसामावेशक सेवा पुरवणारी केंद्र उपलब्ध होण्यासाठी राज्यसेवा हक्क आयोगाच्या मुख्य आयुक्तांनी तसेच उपमुख्यमंत्र्यांनीही मनपा, परिषद नगरपंचायतीमार्फत केंद्र सुरू करण्याचे सूचित केले होते. त्यानुसार हा आदेश काढण्यात आला आहे.