मंदार लोहोकरे | सध्या देशभरासह राज्यात करोना महामारीचा प्रादुर्भाव आणि टाळेबंदीमुळे अनेक दुष्परिणाम दिसून येत आहेत. अशा कठीण काळात  अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेला पंढरीचा विठुराया सर्व भुकेलेल्यांसह गरजुंना अन्न-पाणी देत आहे. एवढंच नाहीतर मुक्या जनवारांच्या चाऱ्याची देखील काळजी घेत आहे.

पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून गरजू लोकाना दोन वेळेस अन्नदान केले जात आहे.  तसेच, आता मुक्या जनावरांची भूक देखील भागवली आहे. तालुक्यातील बार्डी येथील वन विभागातील जवळपास ५०० जनावरांसाठी चारा आणि पाण्याची व्यव्यस्था केली गेली आहे. तसेच टाळेबंदी सुरु झाल्यापासून शहरातील तीन हजार लोकाना दोनवेळेचे जेवण  पुरवले जात असल्याची माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे.

करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने १७ मार्च पासून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर पंढरपूर शहर व परिसरात अडकलेल्या मजूर, निराधार नागरिकांना मानवतावादी भूमिकेतून व सामाजिक उत्तरदायित्व म्हणून मंदिर समितीच्यावतीने दररोज तीन हजार फुड पॅकेट देण्यात येत आहेत. तसेच, शहरात काही जनावरे अशी आहेत की,  दान दिलेल्या चाऱ्यावरच त्यांची उपजीविका होती.परंतु लॉकडाउनमुळे त्यांना कोणीच चारा उपलब्ध करून देऊ शकत नाही. त्यामुळे या जवळपास ६० जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला होता. मंदिर समितीने साडेपाच ते सहा हजार रुपयांचा चारा गेल्या १० दिवसांपासून देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.

आणखी वाचा- करोनाच्या संकटात ‘डीएनआर’ वाहतूक कंपनीने जपली सामाजिक बांधिलकी

तसेच मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे यांनी बार्डी येथील वनविभागातील जनावरे चारा पाणी मिळत नाहीत. त्या जनावराची सोय करावी अशी मागणी समितीकडे केली.याबाबत मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी,व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी पाहणी केली. बार्डी येथील वन क्षेत्रामध्ये ३०० पेक्षा जास्त गाई व २०० पेक्षा जास्त हरीण, काळवीट व इतर वन्यजीव आहेत. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये या वन्यजीवांना विविध स्वयंसेवी संस्थेकडून चारा पुरवठ्याचे काम केले जात होते. परंतु कोरोनाचा पादुर्भाव वाढल्याने अनेक गोष्टीवर निर्बंध आल्याने या स्वयंसेवी संस्थांनी इकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे या वन्यजीवाचा खास करून 300 हुन अधिक गाईंचा चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला होता व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती.

आणखी वाचा- जगण्याची जिद्द! नागपूरमध्ये ‘कॅन्सर’ग्रस्त रुग्णानं केली करोनावर मात

यवार सह अध्यक्ष श्री गहिनीनाथ महाराज औसेकर व इतर सर्व सदस्य महोदयांशी चर्चा करून या वन्य प्राण्यांना मंदिर समितीने वाचविण्याचा निर्णय घेतला आहे. यातील पहिला टप्पा म्हणून ४ मे रोजी २५०० पेंडी देशी कडबा या वन क्षेत्राजवळील श्री सुखदेव महाराज मठात ठेवण्यात आला आहे. त्याप्रमाणे दररोज १५० ते २०० पेंडी चारा या वन्य जीवांना देण्यास आजपासून सुरुवात केली आहे. तसेच दर दोन दिवसांनी २५ हजार लिटर पाणी टँकर द्वारे पाठवून तेथील पाण्याची टाक्या व पाणवठे भरून घेण्यात येत आहेत. जेणेकरून या तहानलेल्या जीवांना पाणी वेळेत उपलब्ध होईल, अशी माहिती कार्यकारी अधिकारी जोशी यांनी दिली.