अडीच वर्षांपूर्वी शिवसेना आणि भाजपा यांच्यात काडीमोड होऊन महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं होतं. भाजपाला राज्यात सर्वाधिक जागा मिळून देखील मुख्यमंत्रीपदावरून दोन्ही पक्षांमध्ये मतभेत ताणले गेले आणि परिणाम २५ वर्षाची युती तुटण्यात झाला. मात्र, तेव्हापासून आजपर्यंत राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार पडणार आणि भाजपा-शिवसेना पुन्हा एकत्र येणार या चर्चा सातत्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या कारणाने यावरून चर्चा रंगताना पाहायला मिळतात. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सकाळी नागपुरात बोलताना या मुद्द्यावर भूमिका मांडली असताना त्यावर आता भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेल्या सूचक वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. संजय राऊतांनी ठामपणे दिला नकार! शिवसेना खासदार संजय राऊत शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने नागपूर दौऱ्यावर असताना त्यांनी भाजपाशी युतीसंदर्भातल्या चर्चांवर स्पष्टपणे नकार दिला. "शिवसेनेच्या बाबतीत भाजपानं जे वातावरण निर्माण केलंय, ते करण्याची गरज नव्हती. २५ वर्ष आपण एकत्र काम केलंय. ज्या पद्धतीने तुम्ही सूडानं केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून काम सुरू केलंय ते आम्ही विसरू शकणार नाही. जो विसरेल तो खरा राजकारणी नाही", असं राऊत म्हणाले आहे. संजय राऊत यांच्या भूमिकेवर पत्रकारांनी बीडमध्ये पंकजा मुंडे यांना विचारणा केली असता सुरुवातीला त्यांनी यासंदर्भात भाष्य करण्यास नकार दिला. मात्र, नंतर त्यांनी केलेलं सूचक विधानच चर्चेला कारण ठरत आहे. पंकजा मुंडेंचं सूचक विधान "आत्ता यावर मला टिप्पणी करता येणार नाही. पक्षातील प्रदेशाध्यक्ष आणि निर्णय घेणारे लोक याबाबत निर्णय घेतील. पण राजकारणात कधीही कोणतीही भविष्यवाणी बदलू शकते असं माझं मत आहे", असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. दरम्यान, पंकजा मुंडेंनी स्पष्टपणे होकार दिला नसला, तरी स्पष्टपणे नकार देखील दिला नसल्याचं म्हटलं जात आहे. एमआयएमची ऑफर राष्ट्रवादी काँग्रेस स्वीकारणार का? जयंत पाटील म्हणतात, “ते भाजपाची बी टीम नसतील, तर..!” गेल्या दोन दिवसांपासून राज्यात एमआयएमनं दिलेल्या ऑफरचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला युती करण्यासंदर्भात प्रस्ताव दिला आहे. एमआयएमला देखील महाविकास आघाडीत सहभागी व्हायचं आहे, असं म्हणत विरोधकांनी त्यावरून टीका केली असताना शिवसेनेकडून देखील ही विरोधकांची चाल असल्याचं टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंच्या विधानामुळे नव्याने चर्चा होऊ लागली आहे.