“शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापनेत माझा खारीचा काय मुंगीचा देखील वाटा नाही. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मी पूर्णपणे अनभिज्ञ आहे, असं वक्तव्य भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारानंतर पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. याच पार्श्वभूमीवर आज त्यांनी हे विधान केलं आहे.

नक्की पाहा >> Photos: “…तर बावनकुळेंना मुख्यमंत्री होण्याची संधी”; देवेंद्र फडणवीस मंचावर असतानाच नितीन गडकरींचं सूचक विधान

परळी येथे आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा रॅली कार्यक्रमामध्ये पंकजा मुंडे सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमानंतर शिंदे-फडणवीस सरकारसंदर्भातील प्रश्न विचारण्यात आला असता पंकजा यांनी आपल्याला हे सरकार स्थापन झाल्याचा आनंद असल्याचं म्हटलं. मात्र त्याचवेळेस हे सरकार स्थापन होण्यात आपला काहीही वाटा नसून मी खोटं श्रेय घेणार नाही, असंही पंकजा म्हणाल्या. जे वंचित आहेत त्या सर्वांसाठी मी लढणार आहे, असंही पंकजा यांनी म्हटलं आहे. मंत्रिमंडळात महिलांना स्थान देतील अशी अपेक्षा आहे. यासंदर्भात मी माझी मागणी मांडली आहे, असंही पंकजा यांनी सांगितलं आहे.

नक्की वाचा >> मंत्रीमंडळ विस्तार : ‘तुम्हाला काही फोन वगैरे आलेला का?’ असं विचारलं असता पंकजा मुंडे हसून म्हणाल्या, “…मी त्याला पकडते”

नव्या सरकारचा पहिला मंत्रीमंडळ विस्तार आणि त्यामध्ये वर्णी लागलेल्या मंत्र्यांची नावं यावरून जोरदार चर्चा सुरू आहे. विशेषत: आधीच्या सरकारच्या कालावधीमध्ये पूजा चव्हाण प्रकरणात नाव आल्यामुळे राजीनामा द्यावा लागलेल्या संजय राठोड यांच्या समावेशावरून टीका केली जात आहे. मात्र, राठोड यांच्यासोबतच या विस्तारामध्ये एकाही महिला आमदाराला संधी मिळाली नसल्याची देखील टीका केली जात आहे. यात पंकजा मुंडेंना संधी मिळाली नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. त्यासंदर्भात पंकजा मुंडे यांनी यापूर्वीही सूचक शब्दांत प्रतिक्रिया दिली होती.

नक्की वाचा >> मंत्रीमंडळ विस्तार : ‘तुम्हाला काही फोन वगैरे आलेला का?’ असं विचारलं असता पंकजा मुंडे हसून म्हणाल्या, “…मी त्याला पकडते”

काही दिवसांपूर्वीच रक्षाबंधनाच्या दिवशी महादेव जानकर यांना राखी बांधल्यानंतर पंकजा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधतानाही मंत्रीपदासंदर्भात भाष्य केलेलं. पंकजा यांनी, ““मला मंत्रीपद देण्याइतकी माझी पात्रता नसेल. अजून पात्रतेचे लोक असतील कदाचित. त्यांना जेव्हा माझी तेवढी पात्रता वाटेल तेव्हा देतील. त्याबद्दल मला काही आक्षेप नाही. चर्चा माध्यमे किंवा कार्यकर्त्यांकडून होतात. आता माझे कार्यकर्ते आणि मी देखील शांत बसले आहे. त्यांना ज्यांची पात्रता आहे असं वाटेल, त्यांना ते मंत्रीपद देतील. त्यात माझी काही भूमिका असण्याचं कारण नाही. मी स्वाभिमानाने राजकारण करण्याचा प्रयत्न करते”, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केलेल्या.