संमेलनाच्या मांडवातून शफी पठाण शरद पवार. या सहा शब्दांची जादू जसा महाराष्ट्राचा राजकीय पट सातत्याने अनुभवत आलाय तसा या सहा शब्दांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वालाही कायम आपल्या आकर्षणाच्या वलयात गुंतवून ठेवले. पवार आता आपल्या राजकीय उत्तरार्धाच्या शेवटाला पोहोचलेत, असे दावे करून त्यांचे विरोधक कितीही आनंदी होत असले तरी पवारांशिवाय महाराष्ट्राचे पानही हलू नये, अशी ‘करेक्ट’ तरतूद खुद्द पवारांनीच करून ठेवली आहे. आधी नाशिक आणि पाठोपाठ उदगीरच्या साहित्य संमेलनात पवारांची ही ‘पॉवर’ पुन्हा ठळकपणे अधारेखित झाली, असे म्हणतात, एखाद्या संघटनेत चैतन्य टिकून राहायचे असेल तर त्या संघटनेचा नेता प्रसिद्धीच्या क्षितिजावर कायम झळकत राहायला हवा. पवारांनाही असेच वाटते की नाही, माहीत नाही; पण त्यांच्या अनुयायांना असेच वाटत असावे. कारण, असे वाटण्यावरच त्यांचे असणे निर्भर आहे. तसे नसते तर नाशिक असो की उदगीर पाठोपाठच्या संमेलनांना राष्ट्रवादीचेच स्वागताध्यक्ष कसे लाभले असते? राष्ट्रवादीचे ‘मीडिया मॅनेजमेंट’ जोरदार आहे. कमी वेळात जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचे कसब त्यांनी नेमके हेरले आहे. उदगरीच्या कोणत्याही भागात फिरा पोस्टर्स पवारांचेच दिसतील. ‘महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य’ असे विशेषण या पोस्टरवर लागलेले. ऐन वेळी राष्ट्रपतींचा कार्यक्रम रद्द झाला, मुख्यमंत्र्यांनीही पाठ फिरवली. हे असे घडले नसते तरी संमेलनाच्या केंद्रस्थानी पवारच असते. कारण, त्यामागे स्वागताध्यक्षांचे अनेक दिवसांपूर्वी ‘दूरदृष्टीपूर्वक’ केलेले नियोजन आहे. पवार आले, पवारांनी पाहिले आणि पवारांनी जिंकले, असेच उद्घाटनीय सोहळय़ाचे वर्णन करावे, इतके ते पवारमय झाले. मंत्र्यांच्या भाषणात पवारांचा उल्लेख, महामंडळ अध्यक्षांच्या भाषणात पवारांचा गौरव, स्वागताध्यक्षांचे भाषण तर जणू पवारांप्रतिची कृतज्ञताच होती. हे झाले मंचावरचे. मंचाखालीही पवारांवर प्रेम करणाऱ्या माणसांचीच गर्दी होती. पवारांचे भाषण संपले अन् सोहळय़ाचा नूरच पालटला. तो इतका की अध्यक्षांना आपले भाषण अर्ध्या रिकाम्या खुच्र्यापुढे करावे लागले. पवारांचे साहित्य संमेलनाशी नाते हे असे विलक्षण आहे. सर्वाधिक साहित्य संमेलनांच्या उद्घाटनाचा विक्रम माझ्या नावावर होईल, असे पवार गमतीने म्हणाले असतीलही; पण पक्षातील त्यांच्या शिलेदारांनी ते फारच गांभीर्याने घेतलेले दिसतेय. कुणी सांगावे, या विक्रमासाठी पुढच्या संमेलनाचा स्वागताध्यक्ष कामाला लागला नसेल..!