राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून ‘पोप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या (PFI) ठिकाणांवर करण्यात आलेल्या छापेमारीनंतर नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पीएफआयच्या सदस्यांकडून संघ मुख्यालयाची टेहळणी करण्यात आल्याचा खुलासा महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकाकडून (ATS) करण्यात आल्यानंतर नागपूर पोलीस सतर्क झाले आहेत.

PFI विरोधातील कारवाईवर इम्तियाज जलील यांचे महत्त्वाचे विधान, म्हणाले “पुरावे नसतील तर…”

“याआधीही आरएसएस मुख्यालयाला धोका निर्माण झाला होता. समाजकंटकांकडून करण्यात आलेले प्रयत्न नागपूर पोलीस दलाने आत्तापर्यंत हाणून पाडले आहेत. एटीएसकडून मिळालेल्या माहितीनंतर मुख्यालय परिसरात चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे”, अशी माहिती नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ‘इंडिया टुडे’ या वृत्त वाहिनीशी बोलताना दिली.

पीएफआयच्या कार्यकर्त्यांची एनआयएकडून धरपकड, मध्यरात्री औरंगाबाद-सोलापुरात मोठी कारवाई

दरम्यान, आज देशातील आठ राज्यांमध्ये एनआयएकडून पीएफआयवर छापेमारी करण्यात आली. या कारवाईत आत्तापर्यंत पीएफआयच्या २४७ सदस्यांना अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, कर्नाटक, आसाम, दिल्ली, तेलंगणा, गुजरात आणि उत्तर प्रदेशात ही छापेमारी करण्यात आली. दहशतवादी कारवायांसाठी आर्थिक मदत पुरवल्याचा पीएफआयवर आरोप आहे. एनआयएची आठवडाभरातील ही दुसरी मोठी कारवाई आहे. दरम्यान, २२ सप्टेंबरला एनआयए आणि सक्तवसुली संचालनालयाकडून देशातील १५ राज्यांमधील ९३ ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली होती. या कारवाईत पीएफआयच्या १०० सदस्यांना अटक करण्यात आली होती.