वाई : बंड करताना थोडाजरी दगा फटका झाला असता तर…मी शहीद होण्याचा धोका होता, मी शहीद झालो असतो असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तापोळा (ता महाबळेश्वर) येथे केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्यातील त्यांच्या जन्मगावाजवळील तापोळा येथे बोलत होते. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच एकनाथ शिंदे आपल्या मूळ गावी म्हणजेच सातारा जिल्ह्यातील तापोळा- दरे परिसरात आले होते. तापोळ्यात एकनाथ शिंदेंचे जोरदार स्वागत करण्यात आलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तापोळ्यात येताच त्यांनी सर्वात आधी पद्मावती देवीचं दर्शन घेतलं. देवीचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी त्यांना भेटायला गेलेल्या नागरिकांशी संवाद साधला. कोयना भाग एकशे पाच गावातील ग्रामस्थांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.दरे गावातही मोठ्या उत्साहात फटाके फोडून ढोल ताशांच्या गजरात स्वागत केले.

    पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, मुंबई माझी कर्मभूमी असली तरी सातारा माझी जन्मभूमी आहे. त्यामुळे आपल्या लोकांनी केलेलं स्वागत हे आनंददायी असतं. आमचं सरकार हे शिवसेना आणि भाजप युतीचं सरकार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी हे सरकार आणखी पुढे नेत आहोत. आता जनतेच्या अपेक्षाही वाढलेल्या पाहायला मिळत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. येत्या १५ ऑगस्ट म्हणजेच येत्या ३ दिवसांत मंत्रिमंडळाचं खातेवाटप होईल. आमचे सरकार हे डबल इंजिन सरकार असून आम्ही भविष्यात डबल स्पीडने काम करु.

    साताऱ्यात पर्यटनाला मोठा वाव आहे. साताऱ्याचा पश्चिम भाग पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. या भागाच्या विकासाच्या विचार सुरू असून लवकरच या बाबतीत आवश्यक ते निर्णय घेतले जातील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. महाबळेश्वरच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही .येथे पर्यटनाला खूप वाव आहे, त्यामुळे येथे नव्याने पर्यटन केंद्र उभारणे व स्थानिकांना रोजगार उभारण्याचा देण्याचा प्रयत्न करू. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारे रस्ते केले जातील. कमी वेळात  पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात पोहोचता येईल अशी व्यवस्था उभारण्याचा माझा प्रयत्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आमच्या पाठीशी आहेत. केंद्र सरकार तुमच्या पाठीशी उभे आहे. तुम्ही विकास करा. निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे असे त्यांनी सांगितले.राज्याला उजेड देणाऱ्या कोयना धरणग्रस्तांचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. मी या भागातीलच भूमिपुत्र असल्याने आता येथील लोकांच्या माझ्याकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्यामुळे कोयना प्रकल्पग्रस्तांच्या चे प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करू.लोकांना आवश्यक असलेल्या सेवा सुविधा पुरविण्याला आमचे प्राधान्य राहील.

   माझ्या गावातील व भागातील म्हणजे माझ्या कुटुंबात मी आलो.लोकांच्या आणि देवीच्या आशीर्वादाने सगळ काही सुरळीत झालं. मी मुख्यमंत्री झालो त्यामुळे सामान्य माणूस मुख्यमंत्री झाला असल्याचा आनंद सर्वाना झाला. राज्यभरात जोरदार स्वागत झालं. गाव खेड्यातील लोकांना आपला मुख्यमंत्री झाल्यबद्दल आनंद झाला. मी गोरगरीबांचे प्रश्न प्रामाणिकपणे सोडवीन असे त्यांनी सांगितले .

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्या नंतर प्रथमच आपल्या दरे ता. महाबळेश्वर या मूळगावी आले असता येथील ग्रामस्थांशी संवाद साधला व हर घर तिरंगा उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करुन दरे गावातील ग्रामस्थांना तिरंगा ध्वजाचे वितरण केले .

 यावेळी ग्रामस्थांनी देखील  आपल्या गावातील सामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्ती मुख्यमंत्री झाल्या बद्दल आनंद व्यक्त करुन मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, वाईचे प्रांतधिकारी राजेंद्र कुमार जाधव, महाबळेश्र्वरच्या तहसीलदार सुषमा पाटील यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Politics treachery rebellion martyred chief minister eknath shinde ysh
First published on: 12-08-2022 at 20:24 IST