बारामती : केंद्र सरकारकडून सत्तेचा गैरवापर होत असून, अधिवेशनात विरोधकांना बोलूच द्यायचे नाही आणि सभागृहात गोंधळ करून हवी ती विधेयके मंजूर करून घेण्याची केंद्र सरकारची भूमिका आहे. असे चित्र यापूर्वी कधीही नव्हते. हा प्रकार किती दिवस चालणार, हे माहीत नाही. मात्र, आता याचा विचार विरोधकांनी एकत्र बसून करावा, असे मत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले. माजी मंत्री अनिल देशमुख, नवाब मलिक आणि खासदार संजय राऊत यांच्या अटकेसाठी सत्तेचा गैरवापर झाला, अशी टीकाही त्यांनी केली. बारामतीत प्रसार माध्यमांशी बोलताना पवार यांनी केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केली. ते म्हणाले, की देशात सत्तेचा गैरवापर केला जात आहे. आजपर्यंत कधी असे चित्र पाहिले नाही. याचा विचार करावा लागणार आहे. सत्ताधारी पक्षाने संसदेचा दर्जा राखण्यासाठी महत्त्वाची पाऊले टाकली पाहिजेत. अनिल देशमुख ,नवाब मलिक आणि संजय राऊत यांच्या अटकेसाठी सत्तेचा गैरवापर झाला. देशमुख आणि राऊत यांच्यावर झालेल्या आरोपांमध्ये तथ्य आढळून आलेले नाही, मात्र घाबरवून सोडण्याचे काम झाले, असेही पवार म्हणाले. देशात ५६ ते ६० टक्के लोक शेती व शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. पाऊस झाला की शेतकऱ्यांची क्रयशक्ती वाढते. भारत हा निर्यातदार देश असू शकतो. अर्थव्यवस्थेसाठी सर्वानी एकत्र आले पाहिजे. सत्तेवर कुणीही असले तरी देशाची अर्थव्यवस्था सुधारावी लागेल. त्या मध्ये राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून काम केले गेले पाहिजे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.