Prakash Ambedkar vs Ajit Pawar on Farmers Loan Waiver : शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा सध्या राज्यात चर्चेत आला आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांनी नागपुरात केलेल्या आंदोलनानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी “सारखंच फुकटात कसं मिळेल?” असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित केला. शेतकरी कर्जमाफी वारंवार कशी मिळेल? असा प्रश्न उपस्थित करत ते म्हणाले, शेतकऱ्यांनी सारखंच कर्ज फुकटात मिळण्याची सवय लावून घेऊ नये. तुम्ही देखील हातपाय हालवा. यावरुन आता विरोधक अजित पवारांवर टीका करू लागले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी अजित पवार यांना प्रश्न विचारला आहे की “राज्यातील शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात असं तुम्हाला वाटतं का?”

प्रकाश आंबेडकर यांनी एक्सवर यासंदर्भात एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “अजित पवार, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात असे वाटते का तुम्हाला? तुम्ही म्हणालात, ‘सरकार शेतकऱ्यांचे कर्ज किती काळ माफ करत राहणार?’ पण खरा प्रश्न असा आहे की, तुम्ही आणि तुमचे सरकार शेतकऱ्यांचे हक्क किती काळ नाकारत राहणार? कधीपर्यंत हजारो कोटी रुपयांचे कॉर्पोरेट कर्ज माफ केले जाईल आणि शेतकऱ्यांच्या मदतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातील?”

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख म्हणाले, “महाराष्ट्रातील शेतकरी अजूनही अवकाळी पाऊस, पिकांचे नुकसान आणि शेतमालाला भाव न मिळण्यामुळे अडचणीत आहेत. हे शेतकरी कठोर परिश्रमाने अन्न पिकवतात. परंतु, तुमचे सरकार त्यांच्या कष्टाची परतफेडही करू शकत नाही!

फडणवीस, शिंदे व तुम्ही तिघांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला : प्रकाश आंबेडकर

“शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्णपणे रास्त आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यापैकी कोणताही मुद्दा नवीन नाही. निवडणुकीपूर्वी प्रसिद्ध झालेल्या भाजपाच्या जाहीरनाम्यात या समस्या सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण, वास्तव असे आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तुम्ही तिघांनी मिळून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे.”

“शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली”

“सोयाबीनसाठी किमान आधारभूत किंमत (एमएसपी) प्रति क्विंटल ५,३२८ रुपये जाहीर करण्यात आली आहे पण, शेतकऱ्यांना फक्त ३,५०० ते ४,००० रुपये भाव मिळत आहेत! म्हणजे जवळजवळ ३० टक्के कमी! कापसाची स्थितीही तितकीच भयानक आहे. अवकाळी पावसाने राज्यातील २९ जिल्ह्यांना उद्ध्वस्त केलं आहे. ६८ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील पिकं नष्ट झाली आहेत. सरकारने मदत जाहीर केली पण, जमिनीवर असलेल्या शेतकऱ्यांपर्यंत एक पैसाही पोहोचला नाही! शेतकऱ्यांनी दिवाळी अंधारात घालवली आणि आता त्यांच्या आशाही पावसात वाहून गेल्या आहेत.”

“शेतकऱ्यांना भिक नको, त्यांचे हक्क द्या”

प्रकाश आंबेडकर म्हणाले, “तुमच्या सरकारला शांत झोप मिळावी म्हणून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात असं तुम्हाला वाटतं का? शेतकऱ्यांना भिक नको आहे, त्यांना त्यांचे हक्क हवे आहेत! वंचित बहुजन आघाडी तुमच्या शेतकरीविरोधी विधानाचा तीव्र निषेध करते!”